लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या २० ते २५ वर्षांपासून कंपनीत काम करीत असलो तरी अद्यापही पुरेसा पगार मिळत नसून किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी बांभोरी (ता. धरणगाव) येथील हिताची ऑटोमोबाईल सिस्टम लि. (चॅसिस ब्रेक इंटरनॅशनल लि.) या कंपनीच्या कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
याविषयी कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या २० ते २५ वर्षांपासून फाउंड्री विभागासह अन्य प्रत्यक्ष उत्पादनाच्या विभागात कामगार काम करीत आहे. यात कंपनीचे व कंत्राटदाराचे केवळ नावे बदल होतात; मात्र कामगारांच्या कामाचे स्वरूप तेच आहे. असे असले तरी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळत नसून साप्ताहिक सुट्या, ओव्हरटाईमचे वेतन व इतर सुविधा पुरविल्या जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. याविषयी सहायक कामगार आयुक्त, कंपनी व्यवस्थापन, कंत्राटदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर व्यवस्थापनाने शासन नियमाप्रमाणे वेतन देण्यात येईल, असे आश्वासन गावकरी, ग्रामपंचायत सदस्यांसमोर दिले होते; मात्र अजूनही नियमानुसार वेतन मिळत नसल्याचे कामगारांनी तक्रारीत म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्यावतीने (इंटक) सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सुनील अहिर, सचिव राजेश तळेकर, सादिक खान, सल्लागार रत्ना महाले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. नरेंद्र पाटील, चंदू नन्नवरे, योगेश नन्नवरे, धनराज नन्नवरे, विठ्ठल नन्नवरे, रवींद्र नन्नवरे, आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.