हातकणंगले : माणगाव (ता. हातकणंगले ) ग्रामपंचायतीच्या वतीने माणगावमधील शेतमजूर महिलांसाठी ताराराणी -कवच नावाने १ लाख रुपयांचा विमा उतरविण्यात येणार आहे. १५ मार्च रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त याची सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच राजू मगदूम व उपसरपंच अख्तर हुसेन भालदार यांनी दिली.
माणगाव ग्रामविकास आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ही योजना अंमलात आणली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. माणगाव ग्रामपंचायतीस विकासकामे व अनेक योजनांच्या जोरावर जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्रातील अनेक पुरस्कार मिळाले असून कुशल नियोजनामुळे व ग्रामस्थांच्या सहकार्याने राज्यातील अग्रेसर ग्रामपंचायत करण्याचा मानस सरपंच राजू मगदूम यांनी यावेळी व्यक्त केला.