लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्जांची संख्या वाढल्याने लॉटरी काढली गेली. त्यात अर्ज केलेल्या ११०३ पैकी केवळ २१९ शेतकऱ्यांचीच निवड केली आहे. प्रत्यक्ष लाॅटरीवेळी भात, सोयाबीन, मका ही पिके वगळल्याने केवळ १९ टक्केच शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरले असून, ८८४ जण वंचित राहिले आहेत. आता या शेतकऱ्यांना सोमवारी तूर आणि नाचणीचे बियाणे घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान २१० शेतकऱ्यांना नाचणीचे बियाणे मोफत, तर ९ जणांना तुरीचे बियाणे २० टक्के सवलतीत दिले आहे.
राष्ट्रीय अन्नधान्य विकास मोहिमेंतर्गत चांगले, दर्जेदार बियाण्यांच्या निर्मिती व्हावे म्हणून शेतकऱ्यांना बियाणे उत्पादनासाठी उद्युक्त केले जात आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला तूर आणि नाचणीचे बियाणे निश्चित केले आहे. हे पायाभूत बियाणे असल्याने त्याचे उत्पादन करून पुढील वेळी पेरणीसाठी वापरता येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून हे बियाणे दिले जाणार असल्याने ११०३ शेतकऱ्यांनी अर्ज केला होता; पण प्रत्यक्षात २१९ जणांनाच त्याचा लाभ झाला असून, ८८४ जण यापासून वंचित राहिले आहेत.
१) अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज - ११०३
लॉटरी किती जणांना - २१९ (नाचणीचे २१०, तुरीचे ९)
२) कोणत्या तालुक्यात किती?
नाचणीचे बियाणे: २१० शेतकरी गडहिग्लज: १९ पन्हाळा: ९७ शाहूवाडी: ९४
तूर बियाणे: कागल ०९ शेतकरी
चौकट
ज्या शेतकऱ्यांनी हे बीजोत्पादन घेतले आहे, त्यांच्याकडून ते बियाणे पुढील वर्षाच्या पेरणीसाठी विकत घेतले जाणार आहे. हे बियाणे महाबीजकडून पूर्णपणे मोफत वाटण्यात आले आहे. फक्त तुरीच्या बियाण्याला २० टक्के सवलत दिली आहे.
चौकट
बीजोत्पादनासाठी प्रोत्साहन म्हणून प्रात्यक्षिक पिकासाठी भात, सोयाबीन, मका, नाचणी, तूर या बियाण्यांची शिफारस कृषी विभागाकडून या योजनेसाठी करण्यात आली होती. त्यानुसार अर्जही मागण्यात आले; पण शासनाने नाचणी आणि तुरीचाच समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने अन्य पिकांसाठी मागणी केलेले शेतकरी यापासून बाहेर फेकले गेले. त्यामुळेच अर्ज केलेल्यांची संख्या व प्रत्यक्ष लाभ मिळालेलींची संख्या यात तब्बल ८० टक्क्यांचा फरक येत आहे.