सदाशिव मोरे
आजरा
: आजरा नगरपंचायतीच्या ४० कर्मचा-यांचे अद्यापही नगरविकास विभागाकडे समायोजन झालेले नाही. सफाई व पाणीपुरवठा विभागातील या कर्मचा-यांना गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. वाढीव आकृतीबंधानुसार कर्मचा-यांचे समायोजन न झालेस नगरपंचायतीला भविष्यकाळात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होवून ३ वर्षे ९ महिने झाले आहेत.
ग्रामपंचायतीकडील ५३ कर्मचा-यांपैकी फक्त १३ कर्मचा-यांची नगरपंचायतीकडे समायोजन झाले आहे. ४० कर्मचारी अद्यापही समायोजनाच्या प्रतीक्षेत आहेत. लिपिक ५, सफाई कर्मचारी २१, पाणीपुरवठा कर्मचारी १४ असे ४० कर्मचारी आहेत.
२०११ च्या लोकसंख्येनुसार वाढीव आकृतीबंध मंजूर होवून त्यानुसार कर्मचा-यांचे समायोजन करा, अशी कर्मचारी संघटनेची मागणी आहे. मात्र नगरविकास विभागाकडून अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही.
समायोजनाच्या प्रतीक्षेत असलेले आजरा नगरपंचायतीकडील सफाई व पाणीपुरवठा कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षांपासून ग्रामपंचायतीपासून कार्यरत आहेत. या कर्मचा-यांचे नगरविकास विभागाकडे समायोजन होणे गरजेचे आहे. शहराची स्वच्छता व पाणीपुरवठा ज्यांच्या हातात आहे. असेच कर्मचारी समायोजनापासून वंचित व तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. भविष्यकाळात या कर्मचा-यांनी अचानक काम थांबविलेस नगरपंचायतीचे प्रशासन कोलमडण्याची शक्यता आहे.
....नगरपंचायती इकडे शासनाचे अधिकारीच नाहीत
आजरा नगरपंचायत सुरू होऊन ३ वर्षे ९ महिन्यांचा कालखंड झाला आहे. तरीही आकृतीबंधानुसार बांधकाम, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रशासकीय, नगररचना या विभागाचे अधिकारीच नाहीत. मुख्याधिकारी, लेखापाल व कर निरीक्षकच आजरा नगरपंचायतीचा कारभार कर्मचा-यांना घेऊन सांभाळत आहेत.