कोल्हापूर : शहरातील ५७९ फेरीवाले अखेर महापालिका प्रशासनाने अपात्र ठरवले आहेत. वारंवार आवाहन करूनही कागदपत्रे जमा केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. अशा बोगस फेरीवाल्यांची केबिन, हातगाड्या जप्त केल्या जाणार आहेत. ५६०७ इतकेच फेरीवाले अधिकृत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून शहरातील फेरीवाल्यांच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. फेरीवाला झोन आणि नो-फेरीवाला झोन निश्चित करणे, फेरीवाल्यांना बायोमेट्रीक कार्ड देणे आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे होते. महापूर आणि कोरोना या कारणांमुळे महापालिकेने सर्वेक्षणाला तीन ते चारवेळा मुदतवाढ दिली. याची ३१ डिसेंबर अंतिम मुदत होती. त्यामध्येही सर्व फेरीवाल्यांनी कागदपत्रे जमा केली नाहीत. १५ जानेवारी २०२१ रोजी महाराणा प्रताप चौकात फेरीवाले, इस्टेट अधिकारी यांच्या बैठकीत अंतिम चार दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून, ५७९ फेरीवाल्यांना कागदपत्रे जमा केली नसल्यामुळे अपात्र ठरवले आहे.
चौकट
सर्व्हे करणारी कंपनी : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट
सर्व्हे सुरू १५ जानेवारी २०१९
सर्व्हेला मुदत : सात महिने
सर्व्हे झालेले फेरीवाले : ६२१०
अपात्र फेरीवाले : ५७९
अधिकृत फेरीवाले : ५६०७
प्रतिक्रिया
स र्वेक्षण मोहिमेत ५६०७ फेरीवाल्यांनी सर्व कागदपत्र जमा केली आहेत. वारंवार आवाहन करुनही ५७९ फेरीवाल्यांनी कागदपत्र जमा केली नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यांची यादी महापालिकेच्या वेबसाईटवर टाकली जाणार आहे. यानंतर अशा फेरीवाल्यांची केबिन, हातगाड्या जप्त होणार आहे.
सचिन जाधव, इस्टेट अधिकारी
प्रतिक्रिया
महापालिकेकडून पुढील पाच वर्षे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण होणार नाही. बायोमेट्रीक कार्ड मिळणार नाही. कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये ज्यांनी कागदपत्रे दिली नाहीत, त्यांना पाठीशी घालणार नाही. मात्र, अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई खपवून घेणार नाही.
आर. के. पोवार, निमंत्रक, सर्वपक्षीय फेरीवाला समिती