कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी राज्य निवडणूक आयोग तसेच महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. राज्यास शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षाचे सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष होऊन गेले परंतु कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे विकासकामांना निधी मिळाला नाही. त्यामुळे सत्तेत असूनही समाधानकारक काम करता आले नाही परंतु आता कोरोना संपला असून नियमित कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधी आणण्याची तिन्ही पक्षांत चढाओढ सुुरू झाली आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात आणले होते. त्यांनी या दौऱ्यात पंधरा कोटींचा निधी दिल्याची घोषणा केली. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून २५ कोटींचा निधी आणण्याचा निर्धार क्षीरसागर यांनी केला आहे. महापालिकेला तातडीने विकासकामांचे प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे हा निधीही मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना निधी आणण्यात वरचढ होत असल्याचे लक्षात येताच आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास, सचिन पाटील, विनायक फाळके, उत्तम कोराणे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वीस कोटींचा निधी मागितला. पवार यांनीही तो देण्याचे आश्वासन दिले.
निवडणुकीच्या अनुषंगाने विधायक तसेच विकासकामांत तीन पक्षांत सुरू असलेली चढाओढ ही शहराच्या पथ्यावर पडणार आहे. शिवसेनेचे पन्नास आणि दोन्ही कॉंग्रेसचे वीस असे मिळून सत्तर कोटींचा निधी मिळणार असल्याने अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. निधी जर मंजूर झाला तरी कामे सुरू होण्यास आणखी सहा सात महिने लागतील. मात्र, हा मुद्दा प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू असेल.