गांधीनगर : साप, नाग म्हटलं की अनेकजणांची भीतीने गाळण उडते. मात्र, गांधीनगरातील एका अवलियाने गेल्या २५ वर्षांत तब्बल १५ हजारा सापांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडल्याची किमया केली आहे. स्टीफन बिरांजे असे या सेवाभावी व्यक्तीचे नाव.
गेल्या २५ वर्षांमध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे ,अशा विषारी सापपासून ते धामण किडका, ईरोळा, अशा बिनविषारी हजारो सापांना बिरांजे यांनी पकडून जंगलात सोडले आहे. हातावरचे पोट असणाऱ्या स्टीफन बिरांजे याची परिस्थिती मात्र हलाखीची आहे. मात्र, अशाही परिस्थितीत कोल्हापूर आणि परिसरात कुठेही साप निघाल्याचा निरोप त्यांना मिळाला की बिरांजे तिथे पोहोचतात. विशेष म्हणजे कर्नाटकमध्येही त्यांना साप पकडण्यासाठी बोलावणे येते. हातातले काम सोडून ते तत्परतेने तेथे हजर होतात. साप पकडतांना तीन-चार वेळा विषारी सापाने दंश केल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, तरीही त्यांनी हे आपले कार्य चिरंतन सुरूच ठेवले आहे.
फोटो: १२ गांधीनगर बिरांजे
ओळ : गांधीनगर येथील महावितरण कार्यालयात आलेल्या नागाला पकडताना सर्पमित्र स्टीफन बिरांजे. (छाया अनिल निगडे)