कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत, सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी झाल्याने सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील सर्व दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने शनिवारी केली. संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना याबाबतचे निवेदन दिले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ६ एप्रिलपासून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. व्यापाऱ्यांना खासगी सावकारांकडून सोने, वाहने व इतर मौल्यवान वस्तू गहाण ठेवून व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे. दोन महिने घरी बसल्याने व्यापाऱ्यांचे शारीरिक व मानसिक संतुलन बिघडले असून ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. सध्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू आहेत यासह सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी व त्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी वाढवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, अध्यक्ष प्रशांत शिंदे, अजित कोठारी उपस्थित होते.
---