कोल्हापूर : वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांना पहिल्या टप्प्यात ४३ हेक्टर जमिनीचे ४ सप्टेंबरपर्यंत वाटप करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी दिले. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने ठरल्याप्रमाणे कार्यवाही केली नाही तर ६ सप्टेंबरनंतर गेल्या १६६ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.
चांदोली अभयारण्य व वारण धरणग्रस्तांचे गेल्या १६६ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे,प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्यांबाबत कार्यवाही सुरू आहे, तर काही मागण्यांवर अजून तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, मारुती पाटील यांची बैठक झाली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला पहिल्या टप्प्यात ४३ हेक्टर जमीन शोधून दिली आहे. त्यातून ६० ते ६५ लोकांना जमीन मिळणार असून त्याचे ४ तारखेपर्यंत वाटप करण्याचा निर्णय झाला आहे. ५० हेक्टर मुलकीपड, १५० हेक्टर गायरान अशा २०० हेक्टर जमिनीचा निर्णय होणे बाकी आहे. तसेच गेली २० वर्षे निर्वणीकरणाचा प्रस्ताव पडून आहे त्याची आता सुरुवात झाली असली तरी पुरेशी गती आलेली नाही. याबाबत निर्णय झाल्यास प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटणार आहेत.