लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर तालुक्यात लस वाटपात कमालीचा सावळागोंधळ सुरू आहे. सांगरुळमध्ये तर मनमानी पद्धतीने लस दिली जात असून २०-२२ वर्षांच्या तरुणांना लस मिळते मात्र वयोवृद्धांना ९० दिवस उलटून गेले तरी लसीचा दुसरा डोस मिळत नाही. आरोग्य यंत्रणेच्या कुचकामी नियोजनाचा मनस्ताप मात्र नागरिकांना होत आहे.
केंद्र सरकारकडून लस कमी मिळत असली तरी त्याचे वाटप योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे असते. मात्र तसे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर होताना दिसत नाही. लस आली कधी आणि संपली कधी हेच सामान्य माणसाला कळत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करायची म्हटले तर ते सापडत नाहीत. अशात कोणीतरी लस सुरू झाले असे सांगितले आणि पाळीत जाऊन बसले तर वशिल्याबाजीमुळे लस मिळेलच याची खात्री नाही. सामान्य माणसाला ६० वर्षांचा नियम मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शिफारसीने २० ते २२ वर्षांच्या तरुणांनाही लसीकरण झाले आहे. त्यामुळे विशेषत: वयोवृद्धांमधून संताप व्यक्त होत आहे. सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत झालेल्या लसीकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेपाने वादावादी
सामान्य माणूस लस मिळणार म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून पाळीत बसलेला असतो. मात्र राजकीय पदाधिकारी आपल्या जवळच्या कुटुंबातील व्यक्तींना मध्येच घुसवून लस देतात. याबाबत लसीकरण केंद्रावर वादावादीचे प्रकारही होत आहेत.