संदीप बावचे : जयसिंगपूर :
दीडशे वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगांव-अंकली पूल मजबुतीकरणाचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पूल मजबुतीकरणासाठी निधी मंजूर करण्याची मागणीदेखील युती सरकारच्या काळात करण्यात आली होती. अतिवृष्टी, महापूर, दैनंदिन होणाऱ्या वाहतुकीमुळे हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे या पुलाचे मजबुतीकरण तितकेच गरजेचे बनले आहे. संस्थानिक व ब्रिटिश सरकारने दोन जिल्ह्यांच्या सीमेवर हा पूल उभारुन दळणवळणाला चालना दिली होती. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा उदगांव-अंकली हा कृष्णा नदीवरील १४४ वर्षे पूर्ण झालेला पूल आहे. वर्तुळ आकाराने चुन्याच्या बांधकामात भक्कम दगडाने हा पूल बांधण्यात आला होता. नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर जुन्या पुलाकडे दुर्लक्ष झाले आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. कोणताही धोका पुलाला नसल्याचा अहवाल जरी देण्यात आला असला तरी या पुलाची दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
पाण्याखालील पिलरची पाहणी करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर आयआयटी तज्ज्ञांच्या समितीकडून त्याची तपासणी करण्यात आली होती. सध्या पुलाची पाहणी केली असता त्याची दुरवस्था दिसून येते. त्यामुळे या पुलाचे मजबुतीकरण करण्याची मागणी होत आहे. युती सरकारच्या काळात पाण्यावरील पिलरच्या दुरुस्तीसाठी निधीचीदेखील मागणी करण्यात आली होती. तसा प्रस्तावदेखील शासनाकडे पाठविण्यात आला होता, अशी माहिती बांधकाम विभागातून देण्यात आली.
चौकट - पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न गरजेचे
पावसाळ्यात निम्म्याहून अधिक पूल पाण्याखाली जातो, तर महापुरावेळी अधिक दिवस पूल पाण्याखाली जात असतो. नदीची पाणी पातळी खालावल्यानंतर पिलरमधून पाणी पाझरु लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या पुलाच्या मजबुतीकरणाचा मुद्दा पुढे आला होता.
फोटो - ११०३२०२१-जेएवाय-०३-सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगांव-अंकली पुलाचे संग्रहित छायाचित्र.