कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी आले असून पाण्याला उग्र वास येत आहे. औद्योगिक कारखान्यांचे रसायनयुक्त सांडपाणी असल्याने नदीपात्र पाण्याच्या प्रवाहाने फेसाळत आहे. आंदोलकांनी वारंवार आंदोलन केल्याने व जिल्हाधिकारी यांनी नदी प्रदूषणाबाबत कडक भूमिका घेऊनही नदीच्या प्रदूषणात वाढच कशी होत आहे? असा प्रश्न पंचगंगाकाठच्या नागरिकांतून उपस्थित करीत संताप व्यक्त केला जात आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणात अव्वल स्थानावर आहे. दूषित पाण्यामुळे शेतीबरोबर नागरिकांनाही विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. नदी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी, यासाठी पंचगंगा काठचे नागरिक वारंवार आंदोलन करीत असतात. एक महिन्यापूर्वी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीच्या विश्वास बालिघाटे व बंडू पाटील यांच्यासह पाचजणांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केला होता. हा प्रश्न विधानसभा व मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ कडक भूमिका घेईल व नदी प्रदूषणास काहीअंशी आळा बसेल, अशी आशा पंचगंगा काठच्या नागरिकांना असताना गेले दोन दिवस नदीपात्रात गटारीचे रसायनयुक्त सांडपाणी आले आहे. पाण्याला उग्र वास येत असून वाहत्या पाण्यामुळे फेस तयार होत असल्याने पात्राला फेसाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून दूषित पाण्यापासून मुक्ती कधी मिळणार, असा संतापजनक सवाल करीत आहेत.
फोटो - ०४०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - पंचगंगा नदीपात्रात काळेकुट्ट पाणी झाल्याने पाण्याचा उग्र वास येत आहे.