कोल्हापूर : रामानंदनगर येथील रहिवासी शिवाजी विनायक चव्हाण यांची कार दारात उभी असतानाच त्यांच्या मोबाइलवर फास्टॅगची रक्कम वजा झाल्याचा मेसेज आला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर टोल नाक्यावरून टोलचे ४५ रुपये वजा होताच चव्हाण चक्रावले. अनेकांना असेच अनुभव येत असल्याने फास्टॅग यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
फास्टॅग यंत्रणेने टोल भरण्याची यंत्रणा गतिमान व पारदर्शक केल्याचा दावा रस्ते निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि सरकारकडून केला जातो. मात्र, यात अजूनही अनेक त्रुटी आहेत. रामानंदनगर येथील शिवाजी चव्हाण यांची (एमएच ०२ सीपी ४९३२) ही कार शुक्रवारी दारात उभी होती. शनिवारी पहाटे त्यांच्या मोबाइलवर टोलचे ४५ रुपये कपात झाल्याचा मेसेज आला. सकाळी उठल्यानंतर मेसेज पाहताच ते चक्रावले.
कारची चोरी झाल्याचा संशय आल्याने बाहेर जाऊन कार असल्याची खात्री केली. कार जागेवरच आहे, मग आपल्या खात्यातून टोलची रक्कम कशी काय गेली? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ऑनलाइन तकार केली आहे. दरम्यान, कार दारातच उभी असताना नाशिक टोल नाक्यावर दुसऱ्याच कारच्या फास्टॅगवर त्यांच्या कारचे तपशील कसे काय गेले? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
कार नंबर, फास्टॅग जुळले कसे?फास्टॅग रजिस्ट्रेशन करताना कारचा नंबर आणि संबंधित कार मालकाच्या बँक खात्याचे तपशील जोडले जातात. फास्टॅगचा बारकोड, कारचा नंबर आणि मालकाचे बँक खाते एवढे तपशील जुळले तरच टोलची रक्कम कपात करून घेतली जाते.
अचानक रक्कम कपात होण्याचे प्रकार...फास्टॅग अकाऊंटवर किमान ५०० रुपयांची रक्कम शिल्लक ठेवा, असे मेसेज बँकांकडून येतात. मात्र, जास्त रक्कम असल्यास ती अचानक कपात होण्याचेही प्रकार घडले आहेत. कपात झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी ऑनलाइन तक्रार करावी लागते. त्यानंतरही पूर्ण रक्कम मिळत नसल्याचे वाहनधारक सांगतात. त्यामुळे फास्टॅगबद्दलची विश्वासार्हता कमी होताना दिसून येत आहे.