ताकदीने लढले तरच काँग्रेसला पुनर्वैभव, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण.. वाचा सविस्तर

By विश्वास पाटील | Published: October 22, 2024 12:25 PM2024-10-22T12:25:44+5:302024-10-22T12:27:30+5:30

जिल्ह्याच्या राजकारणाचा पक्षीय तोंडावळा फारसा बदललेला नसला, तरी त्याचे स्वरूप मात्र नक्कीच बदलले

Congress will regain glory only if it fights with strength, politics in Kolhapur district | ताकदीने लढले तरच काँग्रेसला पुनर्वैभव, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण.. वाचा सविस्तर

ताकदीने लढले तरच काँग्रेसला पुनर्वैभव, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण.. वाचा सविस्तर

विश्वास पाटील, उपमुख्य वृत्तसंपादक 

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकीय नकाशात कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा, राजर्षी शाहूंची समतेची भूमी असलेला, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा जिल्हा, अशी ओळख अधोरेखित आहे. लाटेच्या उलट्या दिशेने जाणारा हा जिल्हा आहे. एकेकाळी तो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचाच विचार ही या जिल्ह्याची मध्यवर्ती विचारधारा राहिली आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेसच्याच विचारांचे सर्वाधिक आमदार जिल्ह्यातून निवडून आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला ही ताकद कायम ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी झटावे लागणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन हा पक्ष लढला, तरच काँग्रेसला पुनर्वैभव मिळू शकेल.

जिल्ह्याच्या राजकारणाचा पक्षीय तोंडावळा फारसा बदललेला नसला, तरी त्याचे स्वरूप मात्र नक्कीच बदलले आहे. आता जिल्ह्याचे राजकारण पालकमंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, धनंजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे, नरसिंगराव पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर अशाच घराण्यांभोवती एकवटले आहे. या निवडणुकीत सर्वच दहाही मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवार, इच्छुक म्हणून ज्यांची नावे चर्चेत आहेत, ते झाडून सारे प्रस्थापित राजकीय कुटुंबातील आहेत. नव्या दमाचा, चळवळीतील आलेला, लढणारा कार्यकर्ता म्हणून ज्याला संधी मिळू शकेल, असे एकही नाव दिसत नाही. खरेतर ही राजकीय खंत आहे, परंतु ते वास्तव आहे. त्याची कारणेही तशीच आहे. 

आता पक्ष असले, तरी कार्यकर्त्यांचे पक्षीय केडर विसविशीत झाले आहे. राज्यकर्त्यांनीच त्यांना काहीतरी दिल्याशिवाय प्रचाराला बाहेर पडायचे नाही, अशी सवय लावली आहे. मतदारसंघाच्या प्रश्नांबद्दलची जाण, चांगला विचार, स्वच्छ चारित्र्य, राजकीय निष्ठा हे उमेदवारीचे निकष कधीच मागे पडले आहेत. निवडून येण्याची क्षमता हाच आता सर्वात महत्त्वाचा निकष ठरला आहे. त्या निकषामध्ये पाच-पंचवीस कोटी खर्च करण्याची ताकद, निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा राबविण्याची क्षमता, मतदारांसाठी २४ तास वेळ देण्याची तयारी, सोशल मीडियावरील चमकोगिरी, आक्रमक वक्तृत्वशैली, रक्षाविसर्जनापासून बारशापर्यंत उपस्थित राहण्याची सहनशीलता हे गुण तुमच्याकडे हवेत. मग तुम्ही वैचारिकदृष्ट्या किती प्रामाणिक आहात, तुम्ही खर्च करणार असलेले पैसे कोठून व कसे मिळवले, याचा मतदार फारसा विचार करत नसल्याचे वास्तव सध्या दिसत आहे. 

निष्ठेची बांधीलकी म्हणून लोकांनी संपतराव पवार यांना दोन वेळा आमदार केले. चळवळीतला माणूस म्हणून शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांना एकदा विधानसभेला व दोनदा लोकसभेला निवडून दिले. यापूर्वीही त्र्यंबक कारखानीस, दिनकरराव यादव, शंकर धोंडी पाटील, राऊ धोंडी पाटील, के. एल. मलाबादे, कसबा ठाणेचे एस. डी. पाटील अशा अनेकांना कोल्हापूरच्या विचारप्रेमी जनतेने त्यांचे काम पाहून विधानसभेत पाठवले.

मागच्या पंचवीस वर्षांत गोविंद पानसरे, सुभाष वोरा अशा भिन्न राजकीय विचार असलेल्या नेत्यांनी समाजासाठी आयुष्य वेचले, परंतु तरीही लोकांनी त्यांना ही संधी दिली नाही. आता तर चळवळीतून, सामाजिक कार्यातून पुढे आलेला कार्यकर्ता लोकप्रतिनिधी होण्याची प्रक्रियाच थांबली आहे. ती घराणेशाहीभोवती केंद्रित झाली आहे. या निवडणुकीत मराठा महासंघाच्या माध्यमातून सक्रिय असलेले वसंतराव मुळीक यांचे नाव चर्चेत आले असले, तरी त्यांचा अन्य निकषावर किती निभाव लागतो, यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरेल.

हे सगळे व्हायला राजकीय पक्ष, नेतेच जबाबदार आहेत, असे अजिबातच नाही. आपण मतदार म्हणूनही या परिस्थितीला अधिक जबाबदार आहोत. नेत्याच्या अजून पँट घालायला येत नसलेल्या पोराला युवा नेते म्हणून आपणच खांद्यावर घेत आलो आहोत. भेटवस्तू, देवदर्शनाच्या सहली अशा पॅकेजची मागणी करतात. उमेदवारही त्याची उधळण करतात. हे साऱ्याच निवडणुकीत अनुभवास येत आहे. निवडणुकीतील आर्थिक प्रभाव हा लोकशाहीला नख लावणारा प्रकार आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना सामान्य मतदार म्हणून समाजासमोर यातून चांगल्या लोकप्रतिनिधीची निवड करण्याचे आव्हान आहे.

कोण किती पाण्यात..

  • काँग्रेसचे १९८० च्या निवडणुकीत सर्वाधिक १० आमदार जनतेने विधानसभेत पाठवले. पुढे १९९९ ला पक्षाची दोन शकले झाली तरी मूळ काँग्रेसचे ५ आमदार विजयी झाले होते. ही परंपरा २०१४ ला खंडित झाली आणि जिल्ह्यातून एकही आमदार निवडून आला नाही. मावळत्या सभागृहात काँग्रेसचे ४ आमदार आहेत. त्याशिवाय दोन विधान परिषदेचे आमदार आणि पंचवीस वर्षानंतर खेचून घेतलेली खासदारकी आहे. काँग्रेसचे एवढे पक्षीय बळ राज्यात अन्य जिल्ह्यांत नाही.
  • देशात दहा वर्षे व राज्यात अडीच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपचा पहिला आमदार कोल्हापूरने २००९ ला इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर यांच्या रुपाने मिळाला. मिरज दंगलही त्यास कारणीभूत राहिली. त्यानंतर २०१४ ला त्यांचे सर्वाधिक २ आमदार होते. आता मावळत्या सभागृहात त्यांची पाटी कोरीच आहे.
  • शिवसेनेला १९९० ला कोल्हापूरमधून दिलीप देसाई व बाबासाहेब पाटील-सरुडकर यांच्या विजयाचा पहिला गुलाल जनतेने दिला. या पक्षाला २०१४ ला सर्वाधिक ६ आमदार दिले. मावळत्या सभागृहात त्यांचा एकच आमदार आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापनेवेळी १९९९ ला सर्वाधिक ५ जागा मिळाल्या. दोन खासदारही कोल्हापूरने दिले. त्यानंतर या पक्षाची घसरण होत गेली. आता त्यांचे २ आमदार आहेत.
  • एकेकाळी जिल्ह्यातील प्रबळ पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला १९९९ नंतर (संपतराव पवार यांच्यानंतर) विधानसभेत संधी मिळालेली नाही.
  • जनता दलाची ताकदही जिल्ह्यात एकेकाळी चांगली होती. या पक्षाला १९९० ला श्रीपतराव शिंदे यांच्यानंतर यश मिळालेले नाही.
  • डाव्या कम्युनिस्टमधील माकपला पहिल्यांदा शिवगोंडा पीरगोंडा पाटील यांना १९७८ ला व पुढे १९९० ला के. एल. मलाबादे यांना इचलकरंजीकरांनी त्यांच्या संघर्षाची उतराई म्हणून विजयी केले. इचलकरंजी ही कामगारनगरी होती तेव्हा कम्युनिस्टांचा प्रभाव होता. गोविंद पानसरे हे १९९५ ला कोल्हापुरातून लढले, परंतु लोकांनी पाठबळ दिले नाही.
  • हातकणंगले हा राखीव मतदारसंघ आहे, परंतु तिथूनही रिपब्लिकन पक्षाला अजून कधी विजय मिळालेला नाही.

Web Title: Congress will regain glory only if it fights with strength, politics in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.