शहरातील कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी पालिकेने शहरातील विविध ठिकाणी ॲंटिजन व आरटीपीसीआर तपासणी पथक नेमण्यात आली असून नागरिकांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेची नागरिक धास्ती घेत असून पथक दिसल्यास प्रवासी अन्य मार्गाने प्रवास करत आहेत.
पालिकेची ही मोहीम नागरिकांना जाचक वाटत असलीतरी शहरातील कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यशस्वी ठरली आहे. जिल्हा प्रशासनाने येथील पालिका प्रशासनाला दररोज ९० ॲंटिजन तर ६० आरटीपीसीआर तपासणीचे टार्गेट दिले होते. पालिका प्रशासनाने ही मोहीम प्रभावीपणे राबविल्याने शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर तपासणी टार्गेटमध्ये घट करून ४० वर आणली आहे.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आस्थापनाधारकांनी आरटीपीसीआर तपासणी केल्याशिवाय आस्थापना सुरू करू देणार नाही, असा आदेश काढल्याने शहरातील आस्थापनाधारकांनी पालिकेच्या या मोहिमेत सहभागी झाल्याने आरटीपीसीआरसाठी गर्दी झाली होती.