कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वातंत्र्यदिनी गावोगावी स्थापन होणाऱ्या समितीत सर्वसमावेशकता यावी म्हणून ग्राम समिती स्थापनेचे निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यमान सरपंचच पूरग्रस्त ग्राम समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सदस्य म्हणून विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह माजी सरपंच, आजी-माजी जि.प. व पं.स सदस्य, सहकारी संस्थाचे पदाधिकारी व गावातील प्रभावशाली नागरिक यांचा समावेश करावा लागणार आहे.
२०१९ च्या पाठोपाठ यावर्षी देखील आलेल्या महापुरामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. गावापासून शहरापर्यंत मोठी झळ बसलेल्या या पुराच्या तडाख्याचा सामना करण्याबरोबरच शासनापर्यंत पूरग्रस्तांचा आवाज पोहोचवता यावा म्हणून पूरग्रस्त समिती स्थापन झाली आहे. गावागावांतील गटातटाचे राजकारण व कुरघोड्या पाहिल्या तर समित्याच्या स्थापनेतच वाद होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच हा पुढचा धोका ओळखून समित्यावर नेमके कोण असावेत याबाबतचे निकषच तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, निकष ठरल्यानंतर याबाबतची जनजागृती करण्यासाठी पूरग्रस्त समितीने गावनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शुक्रवारी करवीर तालुक्यातील कोपार्डे, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे या गावांना भेटी देऊन त्यांना या पूरग्रस्त समिती स्थापनेबाबतची माहिती देण्यात आली.