आजरा :
आजरा तालुक्यातील चितळे-भावेवाडीपैकी धनगरवाड्यावर लागलेल्या आगीत अंदाजे ५ लाखांवर नुकसान झाले. आगीत दोन घरांसह शेती, अवजारे व गवत जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, धनगरवाड्यावरील बाबू विठू कस्तुरे यांनी घराशेजारी बांधलेल्या शेडमध्ये जवळपास १ लाख पेंढी गवत रचून ठेवले आहे. दुपारी अचानक या शेडला आग लागली. आगीमध्ये कुस्तुरे यांचे जनावरांचे दोन गोठे व गवताचे शेड जळून खाक झाले. शेडमध्ये २५ हजार गवताचे भारे, शेती अवजारे भरून ठेवली होते. धनगरवाड्यावर अगोदरच पाण्याची वाणवा आहे. त्यातच आग लागल्याने धनगरवाड्यावरील नागरिकांनी घरातील पाणी व बोअरच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. सायंकाळी ५.३० वाजता गडहिंग्लज अग्निशमन दलाच्या गाडीने येऊन आग विझविली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही; पण शॉर्टसर्किटने आग लागली असण्याची शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखविली.
-----------------------------
* पाच वर्षांत दुसऱ्यांदा आग
धनगरवाड्यावर गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा आग लागली. जनावरांचे गवत, शेती, अवजारे, घरगुती साहित्य जळून खाक झाले. पाच वर्षांपासून शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि धनगरवाड्यावर आग विझविण्यासाठी पाण्याचीही व्यवस्था नाही.
--------------------------
* फोटो ओळी : चितळे-भावेवाडीपैकी धनगरवाड्यावर लागलेली आग. क्रमांक : ०७०२२०२१-गड-०५