कोल्हापूर : कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील जय जवान माजी सैनिक बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने ठेवीदारांनी संस्था कार्यालयासमोर ५ एप्रिलला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हा उपनिबंधक व जिल्हा प्रशासनाला दिले.
निवेदनात म्हटले आहे की, वरील पतसंस्थेतील ठेवी वारंवार मागणी करूनही मिळालेल्या नाहीत, पैसे परत मिळावेत यासाठी १२ ऑक्टोबरला संचालक मंडळाच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र त्यावेळी संचालकांनी ठेवी वाटप करण्याचे तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर १९ डिसेंबरला ठेवीदारांनी पतसंस्था कार्यालयासमोर उपोषण केल्यावरही असेच सांगितले गेले. आता संचालक मंडळ उडवाउडवीची उत्तरे देत असून ठेवीची रक्कम कायदेशीर मार्गाने शासनाकडून वसूल करा, असे सांगितले जात आहे. या प्रकाराला कंटाळून नीता साळोखे, गीताबाई पोवार, प्रभावती पाटील, शारदा शिंदे, आनंदा पोवार, मारुती पाडळकर व अन्य ठेवीदारांनी सामुदायिक आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे.
---