कोल्हापूर : गतवर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणलेला २0 कोटींचा निधी सर्व नगरसेवकांना समान वाटण्यात यावा, यासाठी आकांडतांडव करणाऱ्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी यंदाच्या महानगरपालिका अर्थसंकल्पातील निधीचे वाटप करताना भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना तुलनेने कमी निधी दिला आहे. सत्तारूढ आघाडीसह शिवसेनेच्या नगरसेवकांना ऐच्छिक निधी म्हणून प्रत्येकी साडेसात लाखांचा, तर ताराराणी आघाडी-भाजपच्या नगरसेवकांना साडेपाच लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याने या विषयावर सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करताना ३१ मार्चच्या सभेत सत्तारूढ गटाकडून उपसूचना दिली होती. या उपसूचनेनुसार प्रशासनाने सुचविलेला निधी आणि महासभेने त्यात केलेला बदल अंतिम करण्यात आला. प्रशासनाने सर्व नगरसेवकांना केवळ पाच लाखांचा ऐच्छिक निधी धरला होता. त्यात बदल करून कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रत्येकी ७.५० लाख रुपये, तर ताराराणी आघाडी व भाजपच्या नगरसेवकांना ५.५० लाख रुपये देण्याचा निर्णय महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय उपनगरातील ५४ नगरसेवकांना एक लाखाचा निधी जादा देण्यात येणार आहे. प्रशासनाने शहरातील पॅचवर्क करण्यासाठी राखून ठेवलेला तीन कोटींचा निधी सर्व नगरसेवकांना समान म्हणजे २.५० लाख रुपयांप्रमाणे दिला जाणार आहे. याशिवाय चार प्रभाग समिती सभापतींना प्रत्येक चार लाख रुपयांचा निधी स्वतंत्रपणे दिला जाणार आहे. चारपैकी तीन प्रभाग समितींवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे सभापती आहेत. निधी वाटप करताना ताराराणी आघाडी व भाजप नगरसेवकांना कमी निधी कसा मिळेल, याचाच अधिक विचार केलेला आहे. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) ++४ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी २० लाख रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्याची शक्यता गृहीत धरून जर ही गावे शहराच्या हद्दीत आलीच, तर त्यांना नागरी सुविधा देण्याकरिता दोन कोटींचा निधी राखून ठेवला आहे.
महानगरपालिकेत विकास निधी वाटपात भेदभाव
By admin | Published: May 04, 2016 12:18 AM