कळे (ता. पन्हाळा) येथे परीक्षा केंद्र असताना पन्हाळा तालुक्यातील पश्चिम विभागात असणाऱ्या धामणी खोऱ्यातील हरपवडे, अंबर्डे गावातील विद्यार्थ्यांना पन्हाळा पूर्व भागातील कोडोली या केंद्रावर परीक्षेसाठी तब्बल सुमारे ८० कि. मी.चा प्रवास करून जाऊन परीक्षा द्यावी लागली. १६० कि.मी.चा एकूण प्रवास करावा लागला. तसेच कोडोली (ता. पन्हाळा) येथे परीक्षा केंद्र असताना कोडोली परिसरातील विद्यार्थ्यांनाही सुमारे ७० ते ८० कि.मी.चा प्रवास करून कळे येथील केंद्रावर येऊन परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे १२ ते १३ वर्षे वयोगटातील या कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासामुळे पालक वर्गात कमालीची नाराजी पसरली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय ही माध्यमिक शिक्षणासाठी केंद्रीय अर्थसाहाय्यित शाळा आहे. ही निवासी शाळा असून, गुणवंत विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण प्रदान करते. प्रवेश प्रक्रियेसाठी ही परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली, हे पालकांनी समजून घेतले; पण परीक्षा केंद्र इतक्या लांबचे टाकल्याने परीक्षा केंद्रापर्यंत मुलांना घेऊन पोहोचता-पोहोचता त्यांना नाकीनऊ आल्याने परीक्षा व्यवस्थापनाबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.