सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, यांचा तांडा वस्तीमध्ये समावेश करीत वसंतराव नाईक तांडावस्ती बृहत् आराखडा तयार केला आहे. या सर्व्हेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४९ ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्त्या आढळल्या आहेत. ३० हजार १४९ एवढी लोकवस्ती आहे. या सर्व तांडा वस्त्यांच्या मूलभूत विकासासाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ५३ कोटी ४८ लाख १५ हजार ५०० रूपयांचा निधी लागणार आहे.हा आराखडा मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील धनगर, नाथ गोसावी, भोई, कातकरी, बेलदार या विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाचा तांडा वस्तीसाठी सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेअंती वसंतराव नाईक तांडा वस्ती या नावाने २०१५-१६ ते २०२०-२१ या पाच वर्षासाठी विकासाचा बृहत् आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्व्हे करण्यात आलेल्या वस्त्यांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण, नवीन पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर, दिवाबत्ती सुविधा, स्मशानशेड, वाडीअंतर्गत रस्ते, विंधनविहीर खोदणे, संरक्षक भिंत आदी प्राथमिक व मुलभूत सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. गेले वर्षभर सर्व्हे व आराखड्याचे काम सुरू होते. मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पुणे येथील विमुक्त जाती, भटक्या जमाती संचालक यांना हा आराखडा मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. वैभववाडीला सर्वाधिक १८ कोटी ९३ लाखांची गरजपुढील पाच वर्षांसाठी करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार ५३ कोटी ४८ लाख १५ हजार ५०० रूपये निधीची गरज आहे. यात सर्वाधिक निधी वैभववाडी तालुक्याला १८ कोटी ९३ लाख ३० हजार रूपयांची गरज आहे. मालवण २ कोटी २५ लाख ५० हजार रूपये, वेंगुर्ले १ कोेटी ६१ लाख रूपये, सावंतवाडी ६ कोटी ९३ लाख ७३ हजार रूपये, देवगड ६ कोटी ७० लाख ६२ हजार रूपये, कुडाळ १० कोटी ५९ लाख रूपये, कणकवली ४ कोटी १२ लाख रूपये, दोडामार्ग २ कोेटी ३३ लाख रूपये या प्रमाणे तालुकानिहाय तांडा वस्त्यांना विकासासाठी निधीची गरज आहे. आतापर्यंत १२ कोटी १४ लाखांचा निधी खर्चया २४९ तांडा वस्त्यांमध्ये विविध योजनांतर्गत आतापर्यंत १२ कोटी १४ लाख ३६ हजार ६३९ रूपये एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. यात मालवण ६७ कोटी ३८ हजार १३२ रूपये, वैभववाडी ५५ लाख ८० हजार रूपये, वेंगुर्ले २५ लाख ७४ हजार, सावंतवाडी ९ कोटी ४० लाख ३७ हजार ५७५ रूपये, देवगड ४६ लाख ४७ हजार ६२१ रूपये, कुुडाळ २९ लाख ५९ हजार ३११ रूपये, कणकवली ४९ लाख रूपये असा प्रत्येक तालुक्यात खर्च करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)कुडाळमध्ये सर्वाधिक तांडावस्तीजिल्ह्यात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५० ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्ती आहे. देवगड ४२ ग्रामपंचायती, सावंतवाडी ३६, कणकवली ३४, मालवण ३०, वैभववाडी २७, दोडामार्ग २२ व वेंगुर्ले ८ या प्रमाणे तालुकानिहाय ग्रामपंचायतमध्ये तांडा वस्ती आढळली आहे. तसेच मालवण ३७०७, वैभववाडी २७०८, वेंगुर्ले २४३, सावंतवाडी ६५५०, देवगड ६११२, कुडाळ ५५१०, कणकवली ३५३५, दोडामार्ग १७८४ एवढी प्रत्येक तालुक्यात तांडावस्ती आहे.
जिल्ह्यातील २४९ ग्रामपंचायतींमध्ये तांडा वस्ती
By admin | Published: July 25, 2016 10:38 PM