लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात आठ तालुक्यांतील २३८ गावांतील सरपंच व उपसरपंच निवडी आज, मंगळवारी होत आहेत. यापैकी १५ गावांत सरपंच पदाचा आरक्षित उमेदवारच नसल्याने येथे फक्त उपसरपंच निवडी होणार आहेत. करवीर, भुदरगड व शिरोळ तालुक्यातील १७४ गावांच्या निवडी लांबणीवर पडल्या आहेत.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर सर्वच म्हणजे १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर ४३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. मात्र सरपंच आरक्षणावर चार तालुक्यातील सहा गावांतील नागरिकांनी उच्च न्यायालयात हरकत घेतली. यामध्ये संबंधित याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे चार तालुक्यांतील १७४ ग्रामपंचायतींच्या निवडी लांबणीवर पडल्या आहेत. उर्वरित आठ तालुक्यातील २५३ ग्रामपंचायतींच्या निवडी होणार आहेत. मात्र त्यातील १७ ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षित उमेदवार नसल्याने पेच आहे. त्यातील आठ ग्रामपंचायती या करवीर व शिरोळमधील असल्याने आज, मंगळवारी १५ ठिकाणी उपसरपंच निवडी होणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात २३८ गावांच्या कारभाऱ्यांची निवड होणार आहे.
आजच्या सुनावणीकडे लक्ष
करवीर, पन्हाळा, भुदरगड व शिरोळ तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आज, मंगळवारी सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे चार तालुक्यांचे लक्ष लागले आहे. येथे आरक्षणात बदल करण्याचा निर्णय घेतला, तर मग इतर ग्रामपंचायतींचे आरक्षण बदलू शकते. त्यामुळे आता इच्छुक असणाऱ्यांनी देव पाण्यात घातले आहेत.