शिरोळ : नदी प्रदूषणाचा प्रश्न पंचगंगा काठच्या नागरिकांना पाचवीलाच पूजला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचगंगा प्रदूषणाने डोके वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे शिरोळ बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत, तर पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंचगंगेच्या काळ्या पाण्याची शिक्षा आम्हालाच का, असा प्रश्न गेली अनेक वर्षे नदीकाठच्या नागरिकांतून विचारला जात आहे. ठोस उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. जलपर्णीबरोबरच मासे मृत्युमुखी पडतात. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जुजबी कारवाई करण्यापलीकडे काही होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
रविवारी शिरोळ बंधाऱ्यात दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तर अनेक मासे ऑक्सिजन घेण्याकरिता पाण्यावर तरंगताना दिसून आले. दूषित पाण्यामुळे पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दूषित पाणी प्रवाहित होण्यासाठी धरणातून पाणी सोडणे हा पर्याय नाही. याला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो - ०७०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडला आहे. तर दूषित पाण्यामुळे पाण्यातील मासे ऑक्सिजन घेण्यासाठी पाण्याच्या वर येत आहेत. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)