लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून उसाच्या आडसाल लागणीस सुरुवात होते. मात्र यंदा महापुरामुळे लागणीचे काम लांबणीवर पडले आहे. ऑगस्टमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याने पुन्हा महापुराची धास्ती आहे. त्यामुळे नदीकाठावरील उसाच्या आडसाल लागणी खोळंबल्या आहेत. इतर जमिनीमध्ये मात्र लागणीचे काम सुरू झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात इतर पिकांच्या तुलनेत उसाचे क्षेत्र अधिक आहे. त्यातील ३५ टक्के क्षेत्रावर आडसाल लागणी होतात. आपल्याकडे उसाच्या जुलै, ऑगस्टमध्ये आडसाल, ऑक्टोबरनंतर सुरूच्या ऊस लागणी केल्या जातात. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आडसाल लागणी सुरू होतात. ऑगस्ट अखेर नदीकाठासह इतर लागणी पूर्ण होतात. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये भात कापणी झाल्यानंतर लागणी होतात. यंदा शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने नियोजन केले होते, मात्र २३ जुलैपासून अतिवृष्टी व महापुराने सगळे उद्ध्वस्त करून सोडले. नदी काठावरील शिवारात अजूनही दलदल आहे. जमिनीला वापसा नसल्याने उसाच्या लागणी करता येत नाही. त्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये महापुराची धास्ती आहे. इतर ठिकाणी उन्हाळ्यात सरी सोडून त्यामध्ये भुईमूग, सोयाबीन केलेले आहे, तिथे लागणीचे काम सुरू झाले आहे.
जिल्ह्यात पावसाची उघडझाप
जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. सकाळच्या टप्प्यात ऊन पडले, मात्र दुपारी कोल्हापूर शहरासह काही तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या धरणातील पाण्याचा विसर्ग कायम आहे.