कोल्हापूर : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार योजना जाहीर झाली असून, यासाठी प्रवेशिका ३ मार्चपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांनी केले आहे. या पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधित प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र राहतील. स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई ४०००२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. अधिक माहिती व प्रवेशिका https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---
‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी आवाहन
कोल्हापूर : महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी इच्छुक महिलांनीwww.narishaktipuraskar.wcd.gov.in/ www.wcd.nic.in या वेबसाईटवर बुधवारपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीम. एस. डी. शिंदे यांनी केले आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत हा पुरस्कार महिला व बालकांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण व उन्नतीकरिता सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा स्वयंसेवी संस्थांना दिला जातो. तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला बाल कल्याण विभागाने केले आहे.
---
शेतकरी ते थेट ग्राहक या विक्री उपक्रमास प्रतिसाद
कोल्हापूर : विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान आत्माअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात भरवण्यात आलेल्या ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ या विक्री उपक्रमास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती प्रकल्प संचालिका सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिली.
या आठवडी बाजारात जिल्ह्यातील ३ शेतकरी उत्पादक कंपन्या, ४ आत्माअंतर्गत शेतकरी गट तसेच १७ वैयक्तिक शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी १०.५ क्विंटल भाजीपाला व शेतमाल विक्रीसाठी आणला होता. यामध्ये विविध भाजीपाल्यासह सेंद्रीय गूळ, गूळ पावडर, हळद पावडर, आले पावडरची विक्री झाली.
--