कसबा बावडा :
राजाराम कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधी गटाच्या सभासदांची सत्ताधाऱ्यांनी ऑनलाइन सभेच्या नावाखाली तांत्रिक पद्धतीचा खुबीने वापर करत लिंक जोडली नाही, आवाज म्यूट केला. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारता आले नाहीत, असा आरोप विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या सभासदांनी केला. श्रीराम सोसायटीत ही सभा झाली. पुलाच्या शिरोलीचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, सभासदांच्या प्रश्नांना ऑनलाइन उत्तरे देण्यास निष्क्रिय म्हणजे कारखाना हाताळण्यास निष्क्रिय असे हे संचालक मंडळ आहे. कारखाना ताब्यातून जाणार म्हणून त्यांना अशी दुर्बुद्धी सुचली आहे. माजी संचालक बाबासाहेब देशमुख म्हणाले, मोबाइलची लिंक जोडली नाही, त्यामुळे आमचा आवाज दाबला आणि मुस्कटदाबी केली. खोचीचे अजय पाटील म्हणाले, आम्हाला सभेमध्ये सहभागी करून घेतले नाही. त्यांच्या कारकीर्दीतील शेवटची सभा असल्याने त्यांनी गडबडीत गुंडाळली. रुकडीचे किरण भोसले म्हणाले, बेडकिहाळचा कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे एवढाच उद्देश महाडिक यांचा दिसतो.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील (शिये), तानाजी चव्हाण (कसबा बावडा), रघुनाथ चव्हाण (कांडगाव), मानसिंग पाटील (कुंभोज), शिवाजी किबिले (कुंभोज), दगडू चौगले (धामोड) आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती धनाजी गोडसे, उपसभापती संतोष ठाणेकर, राजारामचे माजी उपाध्यक्ष जयसिंग ठाणेकर, राजीव चव्हाण, जे.एल. पाटील, अजित पोवार (धामोडकर), शामराव करपे आदी उपस्थित होते.