लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नोकरीच्या आमिषाने कृषी महामंडळाचे नाव पुढे करुन बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. एकूण ६७ हजार ८१३ पदांची भरती प्रक्रिया सुरु असल्याच्या जाहिरातीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या महिनाअखेरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ‘लोकमत’ने शनिवारी याची शहानिशा कृषी आयुक्त कार्यालयाकडे केल्यावर त्यातील बोगसगिरी उघड झाली. यासाठीच्या अर्जाची फी ३०० ते १००० रुपये असून, ती ऑनलाईनच भरावी, असे सूचविले होते म्हणजे नुसत्या अर्जाचे शुल्क काही लाखांत होते.
सेंद्रिय शेती उत्पादने खरेदी व विक्री महामंडळ या नावाने राज्यात सेंद्रिय शेती उत्पादने वाढविण्याच्या उद्देशाने मानधन व इतर भत्त्यांचे आमिष दाखवत ६७ हजार ८१३ पदांची भरती काढल्याची ही जाहिरात आहे. त्यासाठी दिनांक १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. गाव, तालुका, जिल्हा, संगणकचालक, मदतनीस, ड्रायव्हर या पदांसाठी दहावी, बारावी, पदवीधर, आठवी परवानाधारक अशी शैक्षणिक अट आहे. ही भरती राज्यात प्रत्येक गावनिहाय व एक व्यक्ती दोन पदांसाठी अर्ज करु शकेल, निवड मुलाखतीद्वारे होईल, अर्जदाराची एक एकर शेती व माल साठवणुकीसाठी १० गुंठ्याची जागा असावी, अशा अटी आहेत.
या भरतीवरुन कृषी विभागाकडे वारंवार विचारणा होऊ लागल्यानंतर कृषी आयुक्त स्तरावर याची शहानिशा सुरु करण्यात आली. काहीजणांकडून लेखी तक्रारीदेखील प्राप्त झाल्या. संबंधित व्यक्तीला फोन केला असता, महामंडळाबाबतीत उडवाउडवीची उत्तरे मिळाली. महामंडळाचा स्थायी पत्ता व इतर माहितीची विचारणा केल्यावरदेखील फोन बंद करुन ठेवला. त्यांनी दिलेल्या बेबसाईट व ई-मेलवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे उत्तर मिळाले नाही. हे प्रकरण कृषी विभागाने गंभीरपणे घेतले असून, फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याआधी या जाहिरातीच्या अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
चौकट ०१
मानधनातही फोलपणा
या जाहिरातीत अथवा संकेतस्थळावर मुख्यालयाचा पत्ता दिलेला नाही. ६७ हजार पदे भरायची म्हटली तरी ९७५ कोटी रुपये निव्वळ मानधनावर खर्च करावे लागणार आहेत. या निवडीनंतर ८ ते २५ हजार रुपये दरमहा मानधन देऊ, असे जाहिरातीत म्हटले आहे. पण फक्त सेंद्रिय शेतमालाची खरेदी -विक्री करण्यासाठी एवढा खर्च मानधनावर करणे कुणालाही परवडणारे नसल्याने यातील फोलपणा उघड झाला.