काही दिवसापूर्वी करूळ आणि भुईबावडा घाट परिसरात ढगफुटीसदृश पाऊस कोसळला या मुसळधार पावसाचा फटका करूळ आणि भुईबावडा परिसरातील शेतकऱ्यांना बसला तितकाच तो घाटरस्त्यांना बसला आहे. त्या काळात भुईबावडा घाटात चार ते पाच वेळा दरडी कोसळल्या आहेत, तर करूळ घाटात तीनदा दरडी कोसळल्या. दरडी कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही तासांकरिता ठप्प झाली होती; परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे हे दोन्ही घाटरस्ते खचू लागले आहेत. डोंगरमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहत असल्यामुळे घाटरस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. घाटरस्त्यांना छोटी छोटी भगदाडे पडत आहेत. अतिवृष्टीकाळात भुईबावडा घाटात तीन ठिकाणी रस्ता खचला आहे. तर करूळ घाटात एका ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे भुईबावडा खचलेल्या ठिकाणांची संख्या आता सहावर पोचली आहे तर करूळ घाटातील संख्या पाचवर पोहोचली आहे.
घाटातील अवजड वाहनांच्या वाहतुकीत सातत्याने वाढ होत असल्याने घाट मार्गाला धोका निर्माण झाला आहे. शासनाने वाढत्या अवजड वाहतुकीला लगाम न घातल्यास घाट रस्ता पूर्णतः बंद होण्याची शक्यता जाणकार व्यक्तींकडून वर्तवली जात आहे.
फोटो = भुईबावडा घाटातील तुटलेले संरक्षक कठडे.