कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले असले तरी यामध्ये वशिलेबाजी किंवा भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत.
महापालिकेच्या मंजूर आस्थापनेवरील रिक्त कनिष्ठ लिपिक, मुकादम तथा लिपिक व पहारेकरी या पदावर पात्र वारसदारांना नियुक्तीस प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मान्यता दिली आहे. त्यांना गेल्या सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रे देण्यात आली. श्वेता शिंदे, संकेत शिंदे, शुभम जिरंगे, शुशांत कांबळे, रोहित जाधव, सौरभ तावडे, बालमुकुंद पाटील, चंद्रकांत बुचडे, सुनील करडे, वर्षा भंडारे, दत्ता डवरे, शिवाजी पाटील व श्रीधर कांबळे अशी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली, ही गोष्ट आनंददायक असली तरीही या नियुक्तीबदल काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. कनिष्ठ लिपिक आणि मुकादम कम क्लार्क या नेमणुकांमध्ये हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येते. एकसारखी पात्रता असतानाही काही ठराविक कर्मचाऱ्यांना वरची पदे दिली आहेत. १० ते १५ पूर्वीपासून काम करणाऱ्या शिपायांवर अन्याय असल्याचे मानले जात आहे. त्यांना बढती कधी मिळणार, असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे. महापालिकेत अनेक विभागात अगोदरपासून काम करणारे चतुर्थश्रेणीतील कर्मचारी बढतीच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु त्यांना बढती न मिळाल्यामुळे अन्याय झाला आहे. दहा वर्ष अगोदरपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जादा पगार या नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. हाही एक प्रकारचा अन्यायच असल्याची त्यांची भावना झाली आहे.
.