कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने करवीर तालुका क्रिकेट असोसिएशन (ब)चा, तर दुसऱ्या सामन्यात पॅकर्स क्लबने एमएसईबी पारेषण संघाचा पराभव करीत केडीसीए क गट टी-२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.
राजाराम काॅलेज मैदानावर शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यांत गोकुळ दूध संघाने करवीर तालुका क्रिकेट असोसिएशन (ब) चा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना करवीर संघाने १८.२ षटकांत सर्व बाद ९२ धावा केल्या. यात यश दवे याने १७, तर करण चव्हाण याने १४ आणि सिद्धराज भोसले याने १३ धावा केल्या. गोकुळकडून डाॅ. पांडुरंग मगदूम याने चार, तर युवराज आमलेने तीन आणि अनिल पाटील याने दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना गोकुळ संघाने हे आव्हान १७.१ षटकांत ६ बाद ९३ धावा करीत पार केले. यात किरण पाटील याने ४२, अनिल पाटील याने ११ आणि विजय सासने याने नाबाद दहा धावा केल्या. करवीरकडून गोलंदाजी करताना सूरज शेखने दोन, सिद्धराज भोसले, श्रेयस पाटील, करण चव्हाण, श्रेयस कोळेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
दुसऱ्या सामन्यांत पॅकर्स स्पोर्टस क्लब फौंडेशनने एमएसईबी पारेषण संघाचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पॅकर्सने २० षटकांत ५ बाद १४६ धावा केल्या. यात आकाश कुमार याने नाबाद ३७, शुभम मोहरकरने २७, संजय कदम याने १२ धावा केल्या. पारेषण संघाकडूवन महेश दळवी याने तीन, दिलीप कोळी, सचिन यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पारेषण संघाने २० षटकांत ९ बाद १४१ धावा करीत चिवट झुंज दिली. मात्र, विजयापर्यंत पोहोचण्यास त्यांना अखेरच्या क्षण षट्काराची आवश्यकता होती. मात्र, एकच धाव घेता आली. त्यामुळे पाच धावानी पराभव स्वीकारावा लागला. यात शिरीष पाटील याने ४१ चेंडूंत ५५ धावांची झुंजार खेळी केली. त्यास सचिन यादवने १७, शुभम चरण याने १४ आणि रवी पावरा याने १३ धावा करीत मोलाची साथ दिली. पॅकर्सकडून संतोष राजगोळकरने दोन, आदित्य बराले, संजय कदम, मंदार पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला.