कोल्हापूर : कामगार विभागातील शिपाई भरतीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळूनही अन्याय झालेल्या शिरोळ येथील सुधाकर इंगळे या मराठा समाजातील युवकाची चार वर्षांच्या लढाईनंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर कामगार विभागात शिपाईपदी नियुक्ती झाली. इंगळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मॅटच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर व सदस्य प्रवीण दीक्षित यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
कामगार विभागातील शिपाई पदाच्या भरतीसाठी २०१७ मध्ये इंगळेने अर्ज भरला. लेखी वस्तुनिष्ठ प्रश्नांची १०० गुणांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षांमधील लेखी उत्तर पत्रिकेची एक कार्बन प्रत उमेदवाराकडे देण्यात आली होती. परीक्षेचा अंतिम निकालाची नमुना उत्तर पत्रिका राज्य शासनाच्या कामगार विभागाच्या संकेत स्थळावर प्राप्त होताच सुधाकरने त्याच्या जवळील उत्तर पत्रिकेशी पडताळणी केली असता सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर असल्याने त्यास १०० पैकी १०० गुण मिळून तो खुल्या प्रवर्गात गुणवत्ता यादीत प्रथम येईल, अशी खात्री होती. प्रत्यक्षात निकालात त्याला ९६ गुण मिळाल्याने तो ८ व्या क्रमांकावर गेला. कामगार विभागाकडून उत्तरपत्रिकेची प्रत मागितल्यावर दोन प्रश्नांचे नकारात्मक ४ गुण कमी झाल्याचे व त्यामुळे त्याची नियुक्ती होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याने ॲड. धैर्यशील सुतार यांच्यावतीने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. सुतार यांनी कामगार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचे निदर्शनाला आणून दिले. कामगार खात्याने उत्तरपत्रिकांची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी केली. इंगळे यांच्या लेखणीची शाई आणि प्रत्यक्षात वापरलेली शाई वेगळी असल्याचा अहवाल सादर केला. न्यायालयात जेव्हा सुनावणी झाली तेव्हा एक जागा रिक्त असल्याचे न्यायाधिकरणाच्या निदर्शनाला आले व इंगळे यास सर्वाधिक गुण असल्याने त्यास त्या जागेवर १ आठवड्यात नियुक्ती (खुल्या जागेत) देण्यात यावी, असे आदेश न्यायाधिकरणाने दिले.