कोल्हापूर : वीज तोडणी करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची फसवणूक करणारे आणि एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार हे लबाड असल्याचा आरोप भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुुल चिकोडे यांनी केला.
या दोन्ही निर्णयांविरोधात भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली, यावेळी चिकोडे बोलत होते. जोपर्यंत या दोन्ही विषयात न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजप जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एमपीएससी परीक्षार्थी संदेश हजारे, विशाल पाटील यांनी शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या मतभेदामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून आमचे भविष्य अंधारात लोटत असल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, सरचिटणीस अशोक देसाई यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, विजय आगरवाल, राजू मोरे, सचिन तोडकर, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी, आशिष कपडेकर, मामा कोळवणकर, विशाल शिराळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
१२०३२०२१ कोल बीजेपी ०१
वीजतोडणी आणि एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला.
छाया : आदित्य वेल्हाळ