यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : पंचगंगा नदीच्या महापुरात बाधित झालेल्या इचलकरंजी शहरासह ९ गावांमधील घर पडझड, व्यवसाय, शेती नुकसान याबाबतचे सर्व पंचनामे पूर्ण केले आहेत. पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान बॅँक खात्यात जमा होण्यास सुरू झाले आहे. तसेच दुसरा हप्ता शासन अनुदान प्राप्त होताच जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात महापुराने बाधित झालेली इचलकरंजी शहरासह साजणी, रांगोळी, पट्टणकोडोली-अलाटवाडी, हुपरी, रेंदाळ, चंदूर, रुई, इंगळी ही नऊ गावे येतात. आठ गावांतील दोन हजार ४६८ पूरग्रस्त कुटुंबांना दोन हप्त्यात दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान जमा केले आहे. इचलकरंजीतील एक हजार ५३६ कुटुंबांना दहा हजार रुपये मिळाले आहेत, तर तीन हजार ५०० कुटुंबांना पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला आहे.
दुसरा हप्ता शासन अनुदान जमा झाल्यानंतर दिला जाणार आहे. अन्य नुकसानीमध्ये घर पडझड, गोठे नुकसान, जनावरांचे व व्यवसायाचे नुकसान, त्याचबरोबर शेतीपिकांचे नुकसान याबाबतचे सर्व पंचनामे पूर्ण झाले असून, शासन निर्णयातील तरतुदीनुसार शासनाकडून अनुदान प्राप्त होताच पूरग्रस्तांच्या खात्यावर ते जमा करण्यात येणार आहेत.