कोल्हापूर : नरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळण्याची शक्यता असताना यामध्येच आपण कमी पडत आहोत. यापुढच्या काळात या कामांमध्ये हयगय चालणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिला.
चव्हाण यांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांसह तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची समन्वय आणि आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ताराराणी सभागृहात घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख उपस्थित होते.
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ घेऊन तालुकास्तरीय बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांनी नरेगाच्या कामांवर बहिष्कार घातला होता. याबाबत चव्हाण म्हणाले, हा न्यायालयाचा आदेश मी वाचला आहे. तो ठरावीक मुदतीसाठी होता. त्यामुळे बहिष्कार न टाकता यापुढच्या काळात ही कामे कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्गी कशी लागतील याचे नियोजन करा. प्रसंगी लोकसहभाग घ्या. परंतु पाणंद रस्ते, खडीकरण ही कामे पूर्ण झाली पाहिजेत.
आरोग्य कर्मचारी आणि ज्यांनी आघाडीवर राहून कोरोना काळात काम केले त्यांच्याच लसीकरणाचे काम कमी झाल्याने याबाबत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यास सांगितले. पाणीपुरवठा योजनांपासून ते शाळांपर्यंत आणि महिला बचत गटांपासून ते ग्रामपंचायतींनी दिव्यांगांसाठी करावयाच्या खर्चापर्यंतचा आढावा घेतला.
चौकट
तालुकापातळीवर अधिकारी पहिल्यांदाच
गेल्या काही वर्षात महिन्यातून एकदा होणाऱ्या या समन्वय सभेसाठी केवळ गटविकास अधिकाऱ्यांना बोलावण्यात येत होते. मात्र संजयसिंह चव्हाण यांनी या बैठकीला गटशिक्षणाधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, तालुका आरोग्य अधिकारी या तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनाही या बोलवले होते.
चौकट
हा सूर्य हा जयद्रथ
अनेकदा गटविकास अधिकारी जी माहिती देतील तिच अंतिम मानली जायची. या बैठकीमध्ये एकीकडे हे काम सुरू झाले नाही असे गटविकास अधिकारी सांगत होते. तर उपअभियंता काम सुरू असल्याचे सांगत असल्याचा विरोधाभासही बैठकीत पहावयास मिळाला.