कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिये येथील पूरग्रस्तांना मिळालेला भूखंड तसेच अतिक्रमणप्रश्नी सोमवारी गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिष्टमंडळाला केली.
मौजे शिये येथील गावठाण सर्व्हे नंबर २५९ व २८३ मधील पूरग्रस्तांना मिळालेला भूखंड तसेच अतिक्रमणप्रश्नी सातत्याने सुरू असलेल्या आंदोलन आणि पत्रकबाजीवर तोडगा काढण्यासाठी शिये ग्रामपंचायत व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मंत्री पाटील यांची भेट घेतली.
यावेळी सरपंच रेखा जाधव यांनी शिये गावचे पुनर्वसन आणि पूरग्रस्तांना मदत लवकर मिळावी अशी मागणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी सर्व्हे नंबर २८३ हनुमान नगर व २५९ श्रीरामनगर येथील भूखंड यापूर्वी वाटप केले असून यावर अतिक्रमण झाले असल्याचे सांगितले.
यावर मंत्री पाटील यांनी येथील सध्याचे अतिक्रमण काढता येत नाही. पण गावात आणखी सरकारी जागा सूचवा, त्याठिकाणी पुनर्वसन संदर्भात ठराव करून द्यावा. राज्य सरकार पुनर्वसनासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, विकास चौगले, जयसिंग पाटील, शहाजी तासगावकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात चौगुले, विलास गुरव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
---
फोटो नं १४०८२०२१-कोल-शिये ग्रामपंचायत
ओळ : शिये ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांना भूखंडावरील अतिक्रमण व पुनर्वसनाबाबत तोडगा काढण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
---