हातकणंगले : येथील मध्यवर्ती वस्तीत असलेल्या गावतळ्यात जमा होणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. शेततळ्याचे दूषित पाणी शेजारील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घूसून शेती नापीक होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील नागरिक व शेतकऱ्यांनी नगर पंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
दोन दिवसात यावर तोडगा काढू, असे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांनी दिले. मात्र उपोषणकर्ते उपोषणावर ठाम राहिल्याने मंगळवारी यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
हातकणंगले - इचलकरंजी मार्गालगत असलेल्या गाव तलावामध्ये शहरातील गटारांचे आणि पावसाचे दूषित पाणी एकत्र जमा होते. या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गाव तलावामध्ये दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात या तलावाभोवती असणाऱ्या रहिवाशांच्या घरात हे दूषित पाणी शिरते. शहराच्या पूर्वेकडील श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि शेतामध्ये हे दूषित पाणी जाऊन परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. गाव तलावाचे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचून राहिल्याने शेती नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे.
हातकणंगले गाव तलावाचे पाणी शाहूकालीन मोरीतून हातकणंगले शहराच्या पश्चिमेकडील ओढ्याला सोडण्यात आले होते. मात्र शहरातून इचलकरंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकल्यामुळे ही शाहूकालीन मोरी पूर्णपणे बंद झाली आहे. दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गेली १० वर्षे नागरिक तक्रार करतात. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनालाच नगर पंचायतीसमोर नागरिकांनी उपोषण सुरू केले. मुख्याधिकारी योगेश कदम, नगराध्यक्ष अरुणकुमार जानेवकर, नगरसेवक विजय खोत यांनी उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा करून दोन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र उपोषणकर्ते मागणीवर ठाम राहिले.
फोटो = हातकणंगले नगर पंचायतीसमोर रमेश स्वामी, संतोष टोपकर, सुभाष चव्हाण व श्रीकांत इंगवले हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.