कोल्हापूर : कागलमधील मगदूम हॉस्पिटल व गडहिंग्लजमधील केसरकर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याची कारणे शोधण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दोन स्वतंत्र समित्या स्थापन केल्या.
या हॉस्पिटलमध्ये मागील दोन महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णांच्या झालेल्या मृत्यूचे डेथ ऑडिट करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या गठीत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. रुग्णांच्या मृत्यूस वैद्यकीय किंवा रुग्णालयाचा हलगर्जीपणा निष्पन्न होत असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांनी अशा रुग्णालयावर तत्काळ कारवाई करावी. रुग्णालयबाह्य प्रशासकीय हलगर्जीपणा निष्पन्न झाल्यास त्याबाबत उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे. समितीने गेल्या दोन महिन्यांमध्ये मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची यादी संबंधित वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे हॉस्पिटल यांच्याकडून प्राप्त करून घेणे. रुग्णांच्या मृत्यूबाबत प्रशासकीय व वैद्यकीय कारणे याबाबत चौकशी करणे. रुग्णांच्या मृत्यूबाबत हलगर्जीपणा झालेला असल्यास त्याबाबत माहिती घेणे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची पडताळणी व मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना सूचवण्याच्या आहेत.
समित्या अशा :
१.मगदूम हॉस्पिटल : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्याणी कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित शिंदे व आयएमए सदस्य डॉ. अमर नाईक.
२.केसरकर हॉस्पिटल : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अथणी, व आयएमएचे अध्यक्ष डॉ. एम. एस. बेळगुद्री.