गडहिंग्लज :
ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक आरक्षण पूर्ववत सुरू ठेवण्यात यावे, या मागणीसाठी जनता दलातर्फे येथील प्रांत कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेले निवेदन निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, माजी पंतप्रधान दिवंगत व्ही. पी. सिंग यांनी देशातील सर्व ओबीसी समाजाना न्याय देण्यासाठी मंडल आयोग लागू करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला; परंतु अजूनही ओबीसींना हक्काच्या आरक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली तरी भटके विमुक्त (अ,ब,क,ड) व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसींना ४ टक्के देखील प्रतिनिधित्व मिळालेले नाही. ही वस्तुस्थिती असतानाही नव्या निकालामुळे 'ओबीसीं'चे आरक्षण संपुष्टात आले आहे. त्याचा फटका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ५६ हजार ओबीसी प्रतिनिधींना बसणार आहे. त्यामुळे 'ओबीसी' समाजाचे आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, नगरसेवक उदय पाटील, नरेंद्र भद्रापूर, राजेश बोरगावे, उदय कदम, नाज खलिफा, शकुंतला हातरोटे व सुनीता पाटील, दत्ता मगदूम, रमेश पाटील, गडहिंग्लज कारखान्याचे संचालक बाळकृष्ण परीट, कामगार युनियनचे जनरल सचिव शशिकांत चोथे, राजू नदाफ, राजन जाधव, मोहन भैसकर, बाळासाहेब मुल्ला, विनोद लाखे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकट :
..अन्यथा केंद्राविरुद्ध आंदोलन
ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने प्रयत्न करावेत, अन्यथा केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे जनता दलातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात श्रीपतराव शिंदे, स्वाती कोरी, बाळेश नाईक, बाळकृष्ण परीट, नरेंद्र भद्रापूर, उदय पाटील, शशिकांत चोथे, उदय कदम, दत्ता मगदूम आदी सहभागी झाले होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : १६०८२०२१-गड-०४