कुरुंदवाड : नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना शासनाने अत्यंत तोकडे अनुदान जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांची एकप्रकारे चेष्टाच केली आहे. जिल्ह्याला बसलेला महापुराचा फटका हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे महापुराचे संकट निर्माण झाले असून याची शिक्षा मात्र शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकरीविरोधी सरकार असून शेतकऱ्यांची ताकद दाखवून न्याय मिळविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
बस्तवाड (ता. शिरोळ) येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान नाणीज संस्थेच्यावतीने पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या वाटपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेट्टी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, ऊस पीक नुकसानीपोटी गुंठ्याला १३५ रुपये तर खरीप पिकाला केवळ ६८ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाच्या रकमेतून शेतातील कुजलेले पीकही शेतकरी काढू शकत नाही. नुकसानग्रस्त पूरग्रस्तांचे पीक कर्ज माफ व्हावे, प्रामाणिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने यापूर्वी जाहीर केलेली पन्नास हजारांची अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी या प्रमुख मागणीसाठी आमचा लढा सुरुच राहणार आहे. पूरग्रस्त कुटुंबांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. मात्र, जगद्गुरू नरेंद्राचार्य मठ संस्थांनने पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या रुपातून केलेली मदत पूरग्रस्त कधीही विसरणार नाहीत. माजी आमदार उल्हास पाटील, सावकर मादनाईक, सादिक बागवान, अभिजीत अवसरे, मनोहर गुंड, प्रशांत डांगरे, दिलीप कोळी, सुजाता भुरके उपस्थित होते.
फोटो - १६०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - बस्तवाड (ता. शिरोळ) येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान नाणीज यांच्यावतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.