सुभाष कदम -चिपळूणकाळ्याकभिन्न सह्याद्रीच्या कड्यावर आता पावसाळ्यात हिरवी शाल पांघरली आहे. उंचच उंच कडे आणि त्यातून फेसाळणारे धबधबे म्हणजे शंकराच्या जटेतून वाहणारी गंगाच! कुंभार्ली घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पावसाळ्यात हा घाट पर्यटकांसाठी नयन मनोहारी पर्वणी घेऊन येतो. या घाटाचे वैभव काही औरच आहे. चिपळूण - कऱ्हाड मार्गावर वसलेला कुंभार्ली घाट हा अवघड घाट म्हणून गणला जातो. या घाटातून कोकणात उतरण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सोनपात्राने वाट दाखविली होती. पुढे काळ बदलत गेला आणि हा गुहागर-विजापूर रस्ता अस्तित्त्वात आला. पूर्वी घाटावरचा माल बैलगाडीच्या माध्यमातून गोवळकोट बंदरात येत असे व येथून मंगलोरी कौले, मासे, भात किंवा अन्य सामान घेऊन गाड्या परत घाटावर जात असत. दळणवळणाचे मुख्य केंद्र म्हणून त्याकाळी कुंभार्ली घाट रस्ता गणला जायचा. चिपळूण ही मोठी बाजारपेठ होती. येथील गाडीतळ व इतर खुणा आजही अस्तित्त्वात आहेत. चिपळूण व पश्चिम महाराष्ट्र यांच्यामध्ये पूर्वी देवाणघेवाण चालत असे. यासाठी या घाटाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. आज काळ बदलला. आधुनिकीकरणाच्या झपाट्यात घाटाचीही मोठी हानी झाली. अनेकवेळा येथील काळा कातळ कापला जातो. त्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे अवघड बनले आहे. उंचच उंच टेकड्या त्यावर पडणारा पाऊस व पाऊस थांबल्यावर घाटात पसणाऱ्या धुक्याचे साम्राज्य प्रवाशाला खिळवून ठेवते. वर ढगाळलेले आकाश व सभोवताली धुक्याची चादर लपेटून पर्यटक व प्रवासी प्रवास करीत असतात. हा क्षण अनमोल असतो. अनेकवेळा घाटात मुसळधार पावसाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे या घाटात आता पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. घाटातील नयनरम्य दृश्य, फेसाळणारे धबधबे, विविध फुलणारी रानफुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे पर्यटकांचे मन आकर्षूण घेतात. सोनपात्राचे मंदिर...कुंभार्ली घाटाच्या मध्यावर असलेल्या अवघड अशा यु टर्नवर सोनपात्राचे मंदिर आहे. घाटावरुन खाली येताना किंवा घाट चढून गेल्यावर अनेक खासगी गाड्या येथे सोनपात्राच्या मंदिरात दर्शनासाठी थांबतात. सोनपात्रा नावाच्या धनगर बांधवाने ब्रिटिश अधिकाऱ्यांना या रस्त्याची वाट दाखविली होती. याची एक आख्यायिका आहे. त्यामुळे या घाटात सोनपात्राला अधिक महत्त्व आहे. या घाटाच्या जडणघडणीत सोनपात्राचे मोठे योगदान आहे. ----कुंभार्ली घाट चढताना घाटाच्या मध्यभागी गेल्यावर वानरांचा कळप आपल्या कुटुंबकबिल्यासह उत्साहात फिरताना प्रवाशांच्या नजरेस पडतो. लहान पिलू उराशी बाळगून वानरीन बिनधास्त उड्या घेत असते. या मर्कटलिला पर्यटकांचे व प्रवाशांचे मनोरंजन करतात. अनेक प्रवासी व पर्यटक या वानरांना खाऊ घालत असल्याने ते येथेच विसावतात. ---पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील समन्वयाचा, संस्कारांचा, दळणवळणाचा व व्यापाराचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरलेला हा घाट अनेक वळणे घेऊन कोयना मार्गाचे दर्शन घडवतो. निर्धोक, सुरक्षित व सर्वांना हवाहवासा वाटणारा असा हा घाट पावसाळ्यात तेथील नितांत सुंदर वैभवाने अधिकच खुलतो. सर्वांना हवाहवासा करतो. सध्या या भागात येणारे व या भागातून घाटावर जाणाऱ्यांसाठी हे लेणं ठरले आहे.----कुंभार्ली घाटात आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी लहान मोठे धबधबे कड्याकपारीतून फेसाळत उड्या घेत आहेत. पाण्याचे झरे मुक्तपणे खळखळाट करीत वाहात आहेत. आजूबाजूला असणारी हिरवी वनसंपदा पाहिली की मन हरखून जाते. क्षणभर मन भिरभिरते आणि इथे थबकते. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहतानाच समोर पश्चिमेकडे दिसणारे पिवळे ऊन अस्तित्त्वाची जाणीव करुन देते. कुंभार्ली घाट विविध नयनरम्य नैसर्गिक स्थळांनी अनेकांच्या मनात रूंजी घालतो. हा घाट निसर्गाचे लेणं असल्याने येथील धबधबे पाहण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी हमखास हजेरी लावतात. हा आनंद लुटण्यासाठी तरूणाई मोठ्या संख्येने येत असते. या सर्वांनाच धबधब्यांचे अप्रूप कायम आहे.
कोकणचा ‘वाटाड्या’ कुंभार्ली घाट
By admin | Updated: July 20, 2014 22:47 IST