कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूर-नागपूर रेल्वे आज, शुक्रवारपासून पुन्हा धावणार आहे. आठवड्यातून दोनवेळा ही रेल्वे असणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी कोल्हापुरातून, तर नागपूरमधून दर मंगळवारी, शनिवारी ही रेल्वे सुटणार आहे.
कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी दुपारी पावणेएक वाजता ही रेल्वे निघणार आहे. त्यासाठी २५० प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले आहे. कोल्हापूर, मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी असे या रेल्वेचे थांबे असणार आहेत. नागपूरमधून शनिवारी (दि. १३) दुपारी सव्वातीन वाजता कोल्हापूरच्या दिशेनेही रेल्वे निघणार आहे. अकरा महिन्यांनंतर ही रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. त्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करणे आवश्यक आहे. दरम्यान, नागपूरला कमी वेळेत पोहोचण्यासाठी कोल्हापूर-धनबाद या रेल्वेनंतर आता कोल्हापूर-नागपूर ही रेल्वे प्रवाशांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी गुरुवारी दिली.