कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक: कोल्हापूरच्या राजकीय संस्कृतीत दगडफेक नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 01:26 PM2022-04-06T13:26:10+5:302022-04-06T13:26:41+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात आजवर लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर बाचाबाची, प्रचारादरम्यान आव्हानात्मक भाषा, निकालानंतर हाणामाऱ्या जरूर झाल्या आहेत. परंतु सभा सुरू असताना उधळण्याचे किंवा दगडफेक करण्याची घटना घडलेली नाही.

Kolhapur North Assembly by-election: There is no stone throwing in the political culture of Kolhapur | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक: कोल्हापूरच्या राजकीय संस्कृतीत दगडफेक नाहीच

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक: कोल्हापूरच्या राजकीय संस्कृतीत दगडफेक नाहीच

Next

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजवर लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान थेट विरोधकांच्या सभेत दगडफेक करण्याची घटना घडल्याचा इतिहास नाही. मतदान केंद्राबाहेर बाचाबाची, प्रचारादरम्यान आव्हानात्मक भाषा, निकालानंतर हाणामाऱ्या जरूर झाल्या आहेत. परंतु सभा सुरू असताना उधळण्याचे किंवा दगडफेक करण्याची घटना घडलेली नाही.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या मुक्त सैनिक वसाहतीमध्ये ३ एप्रिलला झालेल्या सभेत विरोधी उमेदवारांनी दगडफेक झाल्याची तक्रार त्यांनी स्वत:च केली आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून केली आहे. त्यामुळे सभेतील दगडफेक हा विषय जोरदार चर्चेचा ठरला आहे. परंतु पातळी सोडून प्रचार, दगडफेक ही कोल्हापूरची राजकीय संस्कृती नसल्याचेच दिलासादायक चित्र मागील निवडणुकांवर नजर टाकल्यास पुढे आले आहे.

चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपाची चौकशी पोलीस करत आहेत. त्यातून योग्यवेळी सत्य बाहेर येईलच. परंतू त्यांच्या आरोपामुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. लोकसभेचे सध्या सतरावे व विधानसभेचे चौदावे सभागृह सुरम आहे. म्हणजे तेवढ्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या कागल, शाहूवाडीच्या पोटनिवडणुका झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही झाल्या परंतु या सभांमध्ये दगडफेक, सभेत मारामारी, किंवा सभा घेण्यास अडचणी निर्माण करणे अशा घटना नाहीत.

काही चुरशीचे प्रसंग असे :

  • कागल तालुका हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि जागरूक आहे. थेट नेत्यांना गावबंदीचे प्रकार येथे घडले आहेत. कार्यकर्त्यांच्या रॅली अडविल्या आहेत. पण सभेत थेट दगडफेकीचे प्रकार घडलेले नाहीत. विधानसभेच्या १९८५ च्या निवडणुकीत घाटगे मंडलिक गटातील संघर्ष टिपेला पोहचला होता. व्हन्नूरजवळ मुरगुड भागातून आलेल्या प्रचार गाडीस अडवून त्यातील लोकांना राजे समर्थकांनी मारहाण केली होती. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून प्रचारासाठी ट्रकमधून कागल भागातील लोक कापशी खोऱ्यात गेले असता मंडलिक समर्थकांनी या ट्रकवर दगडफेक केली होती. मंडलिक मुश्रीफ यांच्यात उभी फूट पडल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांना मुरगुड शहरात येण्यास मज्जाव करीत मंडलिक व पाटील समर्थकांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली होती.
     
  • विधानसभेच्या सांगरूळ मतदार संघात १९८५ ला तत्कालीन नेते श्रीपतराव बोंद्रे यांनी माझ्या लांगेत बोट घालणारा अजून जन्माला आला नसल्याचे वक्तव्य केले. या निवडणुकीत शेका पक्षाच्या गोविंदराव कलिकते यांनी बोंद्रे यांचा ७२४ मतांनी पराभव केल्यावर शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाद्वार रोडवर एकही लांग शिल्लक ठेवली नव्हती. लांग फाडून त्यावर गुलाल टाकून विजयी मिरवणुकीत ती काठीला बांधून नाचवतच कार्यकर्ते आपापल्या गावी गेले होते.
     
  • लोकसभेच्या १९८९ च्या निवडणुकीत इचलकरंजी मतदार संघात तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांना आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी आव्हान दिले होते. त्यावेळी ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी आपण सारे एक होऊया व पक्षाला निवडून देऊ या असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी सा. रे. पाटील यांचे चिन्ह गरुड पक्षी होते. या निवडणुकीत बाळासाहेब माने ७३ हजार मतांनी विजयी झाल्यावर माने गटाच्या प्रत्येक ट्रकवर मातीचे गाडगे होते व ते बडवत कार्यकर्ते कुंभार यांच्या निषेधाच्या घोषणा देत निघाले होते.


श्वास रोखायला लावणाऱ्या काही लढती...

कोल्हापूरच्या इतिहासात अनेक निवडणुका इतक्या चुरशीच्या झाल्या आहेत की निकाल ऐकणाऱ्यांचा श्वास त्यावेळी रोखला गेला. चंदगडला २००४ च्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नरसिंगराव पाटील यांनी शिवसेनेच्या भरमू पाटील यांचा फक्त ११ मतांनी पराभव केला. याच मतदार संघातून १९७८ ला विठ्ठल भैरू पाटील हे अपक्ष म्हणून ८०७ मतांनी विजयी झाले. कागल मतदार संघातून १९८५ ला सदाशिवराव मंडलिक यांनी २३१ मतांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह घाटगे यांचा पराभव केला होता.

गडहिंग्लज मतदार संघात १९९० च्या निवडणुकीत जनता दलाच्या श्रीपतराव शिंदे यांनी काँग्रेसचे बाबा कुपेकर यांचा अवघ्या ६७४ मतांनी पराभव केला होता. करवीर मतदार संघात २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी ७१० मतांनी काँग्रेसचे उमेदवार पी. एन. पाटील यांचा पराभव केला. याच निवडणुकीत शाहूवाडी मतदार संघातून शिवसेनेचेच सत्यजित पाटील-सरुडकर हे विनय कोरे यांचा पराभव करून ३८८ मतांनी जिंकले होते. या सर्व निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साम, दाम, दंड या शक्तींचा वापर दोन्ही बाजूंकडून झाला आहे. मतदान व निकालातही प्रचंड तणावही लोकांनी अनुभवला; परंतु विरोधकाच्या प्रचारसभेवर दगडफेक करून अवलक्षण दाखविण्याचा प्रयत्न फारसा कधी झालेला नाही..

Web Title: Kolhapur North Assembly by-election: There is no stone throwing in the political culture of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.