कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार मिळवत राज्यात बाजी मारली आहे. यवतमाळ जिल्हा परिषद द्वितीय तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली. अनुक्रमे ३० लाख रुपये, २० लाख रुपये आणि १७ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) पंचायत समितीने पटकावला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये तसेच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यशवंत पंचायत राज अभियान सन २०२०-२०२१ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०२०) अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी १२ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही.
चौकट
विभागस्तरीय पुरस्कारांचीही घोषणा
यावेळी विभागस्तरीय उत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांची ही घोषणा केली. या अंतर्गत कोकण विभागात कुडाळ (जि. सिंधुदुर्ग), मालवण (जि. सिंधुदुर्ग), सुधागड-पाली (जि. रायगड), नाशिक विभागात राहाता (जि. अहमदनगर), नाशिक (जि. नाशिक), कळवण (जि. नाशिक), पुणे विभागात कागल (जि. कोल्हापूर), गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), माढा/कुर्डूवाडी (जि. सोलापूर), औरंगाबाद विभागात लातूर (जि. लातूर), नांदेड (जि. नांदेड), शिरुर अनंतपाळ, अमरावती विभागात अचलपूर (जि. अमरावती), दर्यापूर (जि. अमरावती), राळेगाव (जि. यवतमाळ) तर नागपूर विभागात भंडारा (जि. भंडारा), पोभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर) या पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार पटकावले. या पंचायत समित्यांना प्रत्येक विभागात अनुक्रमे ११ लाख रुपये, ८ लाख रुपये आणि ६ लाख रुपये तसेच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल.