कोल्हापूर : ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या २०१९-२०’ सालातील अहवालात राज्यातील अठरा शहरांपैकी कोल्हापूरसह ९ शहरांचा समावेश असल्याचे जाहीर झाले आहे. मंडळाने या अहवालात २००५ सालापासूनची महिन्याची आकडेवारी दिली आहे. कोल्हापुरातील तीन ठिकाणी नोंदविलेल्या अभ्यासानुसार शहरातील प्रदूषणात सातत्याने वाढच होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण रोखण्यास राज्य सरकारने केलेले सर्व प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील हवेतील प्रदूषणाची तपासणी दरवर्षी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’कडून करण्यात येते. त्याचा सविस्तर अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमानुसार राज्यातील १८ शहरांतील हवेचे राष्ट्रीय हवा गुणवत्तेचे निकष निश्चित करण्यात आले. ते मापदंड पूर्ण न करणाऱ्या शहरांमध्ये कोल्हापूरचा समावेश असल्याचे हा अहवाल सांगतो.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, रुईकर ट्रस्ट आणि महाद्वार रोडवरील नोंदीनुसार प्रदूषणाचे कारण ठरणाऱ्या हवेतील रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे पीएम १० चे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्तेकाम, इमारतींचे बांधकाम, धूळ, मोकळ्या जागेतील भूखंडावरील भरत, कचरा, शेतीकामे, तसेच हवेच्या वेगाचा परिणाम प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण सांगण्यात आले आहे.
एसओ, एनओएक्स, सल्फर आणि आरएसपीएमचे हवेतील प्रमाण वाढणे ही प्रदूषणाची कारणे असतात. एसओचे प्रमाण सरासरी ५०, एनओएक्सचे प्रमाण सरासरी ४०, तर आरएसपीएमचे प्रमाण सरासरी ६० इतके असावे लागते. कोल्हापुरातील तीन ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणानुसार या सर्व ठिकाणी एसओचे प्रमाण वाढले नसले तरी आरएसपीएमचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आढळून आले आहे. २००५ पासून यात सातत्याने वाढच झालेली आढळून आल्याने हवेतील प्रदूषण हे गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
(संदीप आडनाईक)