गणपती कोळी
कुरुंदवाड : शहर स्वच्छतेसाठी पालिका मुख्याधिकारी, प्रशासन कर्मचारी, सामाजिक संघटना एकत्र येऊन प्रत्येक रविवार स्वच्छतेसाठी घालवत आहेत. त्यामुळे शहराची स्वच्छतेकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, स्वच्छता शहरवासीयांच्या अंगी रुजावी यासाठी प्रबोधन आणि प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच या स्वच्छतेची जागृती यशस्वी होईल. स्वच्छतेतूनच निरोगी जीवन घडत असते. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने स्वच्छ व सुंदर शहर अभियान राबवत आहे. त्यातून स्पर्धा ठेवून अभियानात मानांकन मिळविणाऱ्या शहराला विकासासाठी भरघोस निधी बक्षिसाच्या रूपात दिला जातो. मानांकन देताना शहराच्या स्वच्छतेबरोबर अभियानात जनतेच्या सहभागाला महत्त्व दिले जाते. जेणेकरून स्वच्छता स्पर्धा आणि बक्षिसापुरते न राहता लोकांच्या नित्याचा भाग बनावा हा उद्देश असतो. मात्र, मानांकन मिळविलेल्या शहरातही हा उद्देश फारसा सफल झाल्याचे दिसत नाही.
येथील शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव, पालिका कर्मचारी, सा. रे. पाटील सोशल फाउंडेशन, विविध सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक रविवारी शहरातील प्रत्येक भाग स्वच्छता करत आहेत. गेली अनेक आठवडे हा उपक्रम सुरू आहे. सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी ही मोहीम राबवत आहेत.
मात्र, नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व आणि प्रबोधन करून किमान आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रबोधन झाले तरच ही मोहीम यशस्वी झाले असे होईल. अन्यथा स्वच्छतेची जबाबदारी पालिका प्रशासन, सामाजिक कार्यकर्त्यांचीच आहे असे समजून स्वच्छता कधीच पूर्ण होणार नाही.
फोटो - ०७०२२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे पालिका प्रशासन, सा. रे. पाटील सोशल फाउंडेशन, सामाजिक संघटनांनी कृष्णा घाट परिसर व उद्यानाची स्वच्छता केली.