कोल्हापूर : सामान्य नागरिक आणि नवीन वकिलांसाठी कोल्हापुरात ‘रिअल लीगल सोल्युशन’ हा नवा मंच सुरू केला आहे. त्याद्वारे तज्ज्ञांच्या माध्यमातून कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती भारतीय जनसंविधान मंचचे पारस ओसवाल यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनसंविधान मंचने चांगुलपणाची चळवळ सुरू केली आहे. त्याअंतर्गत रिअल लीगल सोल्युशन या नव्या मंचचे पाऊल टाकण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकांना कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन केंद्र, आदी विविध कायदेशीर सेवा एकाच छताखाली माफक शुल्कामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मंचच्या सल्लागार मंडळात सांगलीतील निवृत्त जिल्हा न्यायाधीश वर्षा दीक्षित, निवृत्त धर्मादाय आयुक्त शशिकांत साळवे, महसूल विभागातील निवृत्त सचिव सुनील पाटील, आदींसह विविध २५ तज्ज्ञ, विधिज्ञांचा समावेश आहे. सामाजिक विषयांबाबत विनामूल्य कायदेशीर सल्ला दिला जाणार आहे. सध्या मंगळवारपेठेतील भक्तिपूजानगरमध्ये या नव्या मंचचे कार्यालय असल्याचे पारस ओसवाल यांनी सांगितले. या मंचच्या माध्यमातून समुपदेशनही केले जाणार आहे. त्याचा नागरिकांना निश्चितपणे उपयोग होईल. नवीन वकिलांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार असल्याचे वर्षा दीक्षित यांनी सांगितले. यावेळी किरण खटावकर, निखिल इनामदार, आदी उपस्थित होते.