कोल्हापूर : नागरिकांना रेशनचे मोफत धान्य मिळवण्यासाठी थंब करावे लागते, मात्र कुष्ठरुग्ण बांधवांना अंगठा नसल्याने त्यांना गेले चार-पाच महिने धान्य मिळत नसून, त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या बांधवांना पूर्ववत धान्य देण्यात यावे, अशी मागणी विजय पाटील फाउंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, साळोखे पार्क रिंगरोडशेजारी स्वाधार नगर येथील कुष्ठरुग्ण बांधवांंच्या हाताला अंगठा नसल्याने त्यांना थंब करता येत नाही. त्यामुळे त्यांना रेशनवरचे धान्य मिळत नाही. तरी त्यांच्याबाबतीत योग्य विचार करून आठ दिवसांत कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा आंदोलन उभारले जाईल. त्यांना शासनाकडून धान्य मिळेपर्यंत फाउंडेशनकडून धान्य दिले जाईल. यावेळी चंपा आमरस्कर, अनुसया माळी, शोभा पाटील, मंगल पाटील, सुलोचना कांबळे, इंदुबाई कुंभार, मुक्ताबाई माळी, सिंधू भुजबळ, शारदा शिंगे, गंगूबाई आरडे यांना मोफत धान्य देण्यात आले.
--