इचलकरंजी : मुंबईतील लेटर बॉम्बच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन येथील भाजपकडून प्रांत कार्यालयाला देण्यात आले. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली.
या घटनेने महाविकास आघाडी सरकार हे खंडणी बहाद्दर सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. खून, मारामारी, साधू-संतांवर खुनीहल्ला, महिलांवरील अत्याचार वाढले तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, थोर विचारवंत, क्रांतिकारी यांचा अवमान करणारे हे मंत्री आहेत. त्यातच राजरोसपणे खंडणी गोळा करणाऱ्या मंत्र्यांची भर पडली आहे. त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपच्या शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अध्यक्ष अनिल डाळ्या, सुनील महाजन, मिश्रीलाल जाजू, नगरसेवक किसन शिंदे, मनोज हिंगमिरे, आदींसह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
फोटो ओळी
२२०३२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
छाया-उत्तम पाटील