कागल : विविध योजनांमधून राज्यात सुरू असलेली घरकुलांची कामे अनेक कारणांनी रखडलेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीसाठी आपण महाआवास अभियान राबविले आणि अवघ्या शंभर दिवसांत आठ लाखांपैकी पाच लाख घरकुले पूर्ण झाली. आता उर्वरित घरेही येत्या चार महिन्यांत पूर्ण करू. गरिबांना घरकुले देण्यात महाराष्ट्र देशात पुढे असेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले.
महाआवास अभियानांतर्गत जाहीर केलेल्या पुरस्कार योजनेतील कागल पंचायत समिती स्तरावरील पुरस्कारांचे वितरण सोमवारी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्य अंबरीश घाटगे, युवराज पाटील, सभापती रमेश तोडकर, उपसभापती मनीषा सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माने, रवी शिवदास, आदी मान्यवर व सर्व पंचायत सदस्य, पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली.
मुश्रीफांच्यामुळे पंचायतींना नवसंजीवनी
अंबरीश घाटगे म्हणाले, मागील पाच वर्षांत पंचायतराज व्यवस्थेला अक्षरश: मरगळ आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी देऊन पंचायतराज व्यवस्थेला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था आणली. शंभर दिवसांत पाच लाख घरकुले मार्गी लावण्याचे काम केवळ मुश्रीफच करू शकतात.
फोटोओळी.
कागल -
महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट घरकुलाचा पुरस्कार राजेंद्र पांडुरंग पाटील, रा. उंदरवाडी यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी युवराज पाटील, अंबरीश घाटगे, उपसभापती मनीषा सांवत, जयदीप पोवार, इतर उपस्थित होते.