लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर फळमार्केटमध्ये तोतापुरी आंब्याची आवक वाढली असून बाजार समितीत रोज १५ टन आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे पिवळ्याधमक तोतापुरी आंब्यानी फळमार्केट फुलून गेले आहे. भाजीपाल्याच्या दरात काहीसी घसरण झाली असून गवार, भेंडी, वरणा, दोडक्याचे दर कमी झाले आहेत. कडधान्य मार्केट स्थिर असून किरकोळ बाजारात सरकी तेल १५० रुपये किलोवर कायम आहे.
फळमार्केटमध्ये सफरचंद, तोतापुरी आंबा, अननस, केळीची रेलचेल दिसत आहे. फॉरेन सफरचंदचे दर चढे असून किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलो आहे. साधारणता २५ ते ३० रुपयाला एक फळ बसत असल्याने ग्राहक खरेदीसाठी फारसा उत्सुक दिसत नाही. तोतापुरी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने सगळीकडे आंबा पाहवयास मिळत आहे. पिवळाधमक आंबा ५ ते १५ रुपयांपर्यंत मिळत आहे.
भाजीपाल्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक काहीसी वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी घसरण झाली आहे. ‘कोबी’, ‘ढब्बू’ या भाज्या वगळता इतर भाज्यांचे दर तुनलेत कमी झाले आहेत. गवार, कारली, वरणा, दोडका, वाल, बिनीस या भाज्यांचे दर ३० ते ५० रुपयांपर्यंत आहेत. टोमॅटो, वांगी, प्लॉवरचे दर स्थिर आहेत.
कडधान्य मार्केट स्थिर आहे. तूरडाळ ११०, हरभरा डाळ ७०, मूग डाळ ११०, मूग १०० रुपये प्रतिकिलोचा दर आहे. साखर ३५ रुपये, शाबू ६०, सरकी तेल १५० रुपयांवर स्थिर आहे. ज्वारीचे दर प्रतिप्रमाणे ३० ते ५० रुपये किलोपर्यंत आहेत. शेतीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागात कडधान्य मार्केटमध्ये शांतता आहे.
कांदा, बटाट्याचे दर स्थिर असून दरात फारसा चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा ५ ते २०, बटाटा १० ते १८ तर लसूण ५० ते १०० रुपये किलो आहे.
पालक, पोकळा, कोथिंबीर घसरली
पालेभाज्यांची आवक थोडी वाढल्याने दर घसरले आहे. मेथीचे दर स्थिर असून पालक, पोकळा, कोथिंबीरचे दर एकदम खाली आले आहेत.
फोटो ओळी : कोल्हापूरात रविवारी तोतापुरी आंब्याची आवक वाढली असून फळमार्केटमध्ये पिवळ्याधमक आंब्याची रेलचेल पाहवयास मिळत आहे. (फोटो-०४०७२०२१-कोल-बाजार व बाजार०१) (छाया- नसीर अत्तार)